July 16, 2015

माझं आध्यात्म..!

दर्शन, प्रदर्शन आणि जाहिरात म्हणजे आध्यात्म नव्हे..

आमच्या भागवतधर्माने नामस्मरण हा अतिशय सोपा आणि सर्वांना केव्हाही, कधीही करता येण्याजोगा भक्तिमार्ग सांगितला आहे. माझ्या मते तरी हेच खरे आध्यात्म..!

ठीक आहे..श्रुतीस्मृतीपुराणोक्त, कर्मकांड..होमहवन, पोथ्यापुराणं हे मीही मानतो. ते करण्याला ना नाही. पण त्याची जाहिरात नको, अवडंबर नको. कारण जाहिरात, अवडंबर ह्या गोष्टी आल्या की त्यातला देव निघून जातो आणि उरतात ती केवळ ढोंगी कर्मकांड..! तसं होता कामा नये..!

"मग..? गेली पंचवीस वर्ष गुरुवारचा उपास करतोय..!"  

असं अभिमानाने सांगितलंत रे सांगितलंत की गेली ती २५ वर्ष फुकट..!

अभिमान आला, अहं आला की अध्यात्म संपलंच म्हणून समजा..!

उप-वास करताय ना..? मग तो स्वत:पुरता.स्वत:च्या घरात मर्यादित ठेवा. काय खिचडी,फळं खायची ती कुणालाही त्रास न देता खा..

"माझा उपास आहे हो..माझ्याकरता खिचडी करा.."

ज्या क्षणी अहंभावाने अशी ऑर्डर सोडाल की त्या क्षणी त्या उपासाचं महत्व संपलंच म्हणून समजा..!

अगदी आमच्या भागवतधर्मातल्या वारीचंही तसंचं आहे.

"मग..? अहो गेली पंचवीस वर्ष न चुकता वारीला जातोय..!"

असं अभिमानाने म्हटलंत की ती २५ वर्ष फुकट गेलीच म्हणून समजा. २५ वर्ष वारीला जाताय ना..मग काळजी करू नका. विठोबाचं लक्ष आहे तुमच्याकडे..!

"हो..मला रविना टंडन अतिशय आवडते..तिचं सौंदर्य मला भावतं असं खुलेपणाने म्हणा. तिथे आध्यात्म आहे.. पण मनातल्या मनात रवीना आवडत असूनही,

"रवीना माझ्या बहिणीसारखी आहे.."

असं म्हटलंत की त्यातलं आध्यात्म संपलंच म्हणून समजा..! :)

असो.. हे झाले माझे व्यक्तिगत अध्यात्मिक विचार. कुणाला पटतील, कुणाला न पटतील. कुणाला पचतील, कुणाला न पचतील..!

ते सर्वांना पटलेच पाहिजेत असा जर माझा आग्रह असेल तेथे माझंही आध्यात्म संपलं....! :)

कारण आध्यात्मात आग्रह नसतो..हट्ट नसतो..असते ती फक्त परमात्म्यावरची निर्व्याज श्रद्धा.. मग त्या परमात्म्याला तुम्ही गणपती, शंकर, विठोबा, दत्त, अल्ला, येशू, गुरुग्रंथसाहेब.. काहीही नाव द्या.. It makes no difference..!

आणि अखेर अध्यात्म्याचा तरी सगळा हा अट्टाहास का..? तर शेवटचा दिस गोड व्हावा म्हणून..!

फार सुंदर अभंग आहे आमच्या अण्णांचा..! असो..

-- तात्या अभ्यंकर.

-- (तात्यांचे आध्यात्मिक विचार या महान ग्रंथातून साभार..!) :)

No comments: