September 22, 2012

जुने दिवस..

आमची माती आमची माणसं, साप्ताहिकी, अमृतमंथन, प्रतिभा आणि प्रतिमा, छायागीत, गजरा, फक्त शनिवारी आणि रविवारी दाखवले जाणारे मराठी-हिंदी चित्रपट, 
सुहासिनी मुळगावकर, विनायक चासकर, विनय आपटे, सई परांजपे, अरुण जोगळेकर, अनंत भावे, प्रदिप भिडे अशी अन

ेक गुणी माणसं...
वर्ल्ड धीस वीक, चाळ नावाची वाचाळ वस्ती, शोटाइम, हमलोग, नुक्कड, उडान, ये जो है जिंदगी, एक कहानी, सुरभि, बुनियाद, तमस, 'मिले सूर मेरा तुम्हारा', 'बजे सरगम....देश राग', या अवघ्या दोन गाण्यांनी जागवलेली राष्ट्रीय भावना, अशोक चक्रधर संचालित खास होळीनिमित्तचं हिंदी हास्यकविसंमेलन....

आज या सगळ्याची खूप आठवण येते..! आज म्हणे काहितरी तीनशेहून अधिक वाहिन्या आहेत परंतु एकही वाहिनी सलग १५ मिनिटांच्यावर बघवत नाही ही खरी शोकांतिका आहे, आपली सांस्कृतिक दिवाळखोरी आहे..! 

खूप काही पार हरवून बसलो आहोत आपण. आणि म्हणूनच ८० च्या दशकातल्या दूरदर्शनला माझा मानाचा मुजरा...!
-- तात्या अभ्यंकर.

September 14, 2012

इष्काची इंगळी...:)

इष्काची इंगळी..
येथे ऐका - http://www.hummaa.com/music/song/mala-ishkachi-ingali-dasali/134557#

जगदिशरावांची झकास लेखणी, आमच्या गावरान रामभाऊ कदमांचं फक्कड संगीत आणि उषाताईंची ठसकेदार गायकी..

सुरवातीची मस्त यमनातली आलापी..


मी एकलीच निजले रातीच्या अंधारात..
नको तिथ्थच पडला अवचित माझा हात
हाताखालती नागं काढून वैरीण ती बसली..!

नागं काढलेल्या इंगळीला 'वैरीण' म्हटलंय..! :)

जोरदारच लावणी बांधली आहे रामभाऊ कदमांनी.. सुंदर ढोलकी आणि हार्मोनियमचे यमनातले तुकडे केवळ अप्रतिम..!

साऱ्या घरात फिरले बाई गं..
मला 'अवशिद' गवलं न्हाई गं..

छ्या..! आजवर कधी कुणाला इष्काची इंगळी डसल्यावर टायमावर अवशिद मिळालंय का..? अहो अजून अशा अवशिदाचा शोध लागायचाय..! :)

'न्हाई गं.. ' हे शब्द उषाताईंनी अतिशय सुरेख म्हटले आहेत.. आणि त्यातला तो यमनामध्ये येणारा शुद्ध मध्यम.. तोही अगदी अवचितच येऊन पडला आहे..

खरंच कुठे गेली हो आता अशी गाणी..?

या इंगळीचा कळला इंगा..
खुळ्यावाणी मी घातला पिंगा..!

माझ्या मते खेबुडकरदादांच्या या ओळी सुवर्णाक्षरात लिहून ठेवाव्या अशा आहेत.. अहो ही इष्काची इंगळी एकदा का कडाडून चावली ना, की अक्षरश: भल्याभल्यांना पिंगा घालायला लावते.. अगदी खुळं करून सोडते बघा..!



या अजरामर लावणीबद्दल उषाताईंना मोठ्ठं 'थँक यू..' आणि खेबुडकरदादांना व रामभाऊ कदमांना विनम्र आदरांजली..!

(इष्काच्या इंगळीचा मांत्रिक) तात्या अभ्यंकर.. :)

August 31, 2012

शिकवणी - एका कुंद दुपारची..:)

ओ सजना.. बरखा बहार आयी.. -- येथे ऐका - http://www.youtube.com/watch?v=G_KCiPOmNEg

तिचं नांव..? ते जाऊ दे...!.

ती वर्गात होती माझ्या. वाणिज्य शाखा तृतीय वर्ष..

आमची वयं असतील विशीच्या घरातली..

वय वर्ष १९-२०..!

सालं काय वर्णन करावं त्या वयातल्या तारुण्याचं..! शब्दशः: मंतरलेली वर्ष..! त्या वयात कुठल्या जादुई दुनियेत मन वावरत असतं काय समजत नाय बा..

अशातच ती आली माझ्या त्या स्वप्नांच्या दुनियेत.. स्वप्नांचं त्या वयातलं ते बेधुंद राज्य अन मी त्याचा अभिषिक्त सम्राट..! पण त्या राज्याच्या राणीचं सिंहासन मोकळंच होतं.. वर्गातल्या वर्गात आमच्या नजरा जुळल्या.. 'दिल में कुछ कुछ होता है.. झालं आणि राणीच्या त्या रित्या सिंहासनावर ती अवचित येऊन बसली..

आता ध्यानीमनी फक्त तीच दिसू लागली.. कुठेही काही मंगल-शुभ-सुंदर दिसलं की त्यातही तीच दिसू लागली.. कुठे चांगलं गाणं ऐकलं, कुठे काही चांगलंचुंगलं खाल्लं, कधी एखादा उत्तम चित्रपट पाहण्यात आला.. की तीच दिसायची. जे जे उत्तम-उदात्त-उन्नत-महन्मधुर ते ते.. त्या सर्वात फक्त ती आणि तीच दिसू लागली..!

"मला Amalgamation of companies शिकवशील का रे? त्याच्या एंट्रीज मला जमतच नाहीत.. तू सांगशील समजावून..? "

आहाहा.. किती सुरेख आणि सुरेल स्वर तिचा.. चेहऱ्यावरचे ते भाबडे भाव..!

"घरी येशील का रे आज दुपारी माझ्या..? "

ठरल्याप्रमाणे पोहोचलो तिच्या घरी.. वाजले असतील दुपारचे काहीतरी दोन-अडीच.. ती अंधारलेली कुंद पावसाळी दुपार..!

तिची आईही तिच्याइतकीच सुरेख आणि गोड.. मुलीला शिकवायला दुसरा-तिसरा कुणी नसून आपला भावी जावईच खुद्द आला आहे असेच भाव होते हो त्या माउलीच्या चेहऱ्यावर.. म्हणजे मला तरी तेव्हा ते तसेच वाटले.. :)

छान, सुंदर, सुरेख, नीटनेटकं आवरलेलं तिचं घर.. त्या घरातली टापटीप, स्वच्छता सारी तिचीच असेल का हो? अगदी हवेशीर घर.. या खिडकीतून त्या खिडकीत वाहणारी वाऱ्याची मंद झुळूक केवळ तिच्याकरताच वाहते आहे का..? हा फ्लॉवरपॉट तिनेच या विवक्षित ठिकाणी ठेवला असेल का..? ते सुंदर पडदे.. त्यांचं सिलेक्शन तिचंच असेल का..?


छ्या..!

पिरेमात पडल्यावर प्रत्येक गोष्ट सुरेख, सुंदरच का दिसते हो त्या वयात..? त्या वयातली जादू न कळणारी आहे, अगम्य आहे, पण अतीव सुंदर आहे..

निसर्ग..! दुसरं काय? त्या त्या वयाची गणितं तोच बांधून देतो झालं..!

तिनं वह्या-पुस्तकं काढली.. प्राध्यापक अभ्यंकर तिला Amalgamation of companies शिकवणार होते.. :)

"तुम्ही बसा हं.. मी जात्ये केळकरमावशींकडे भिशीला.. " - सासूबाई म्हणाल्या..

जय हो त्या केळकरमावशींचा.. कधीही न पाहिलेल्या त्या केळकरमावशीला मी मनातल्या मनात एक फ्लाइंग किस देऊन टाकला.. :)

आता घरात आम्ही दोघंच.. बाहेर सुरेखसा पाऊस लागला आहे.. आणि त्या कुंद वातावरणातली ती रम्य दुपार.. आणि माझ्यासमोर ती बसली होती... पुस्तकाची दोन-चार पानं उलटली गेली असतील-नसतील,

दुरून कुठूनतरी रेडियोचे स्वर ऐकू आले.. 'ओ सजना.. बरखा बहार आयी.. '..! - सलीलदा आणि दीदीचं एक अतीव सुंदर गाणं.. ताजी टवटवीत चाल आणि जीव ओवाळून टाकावा अशी दीदीची गायकी...!

"ए रेडियो लाव ना.. काय सुंदर गाणं लागलंय बघ.. "

लगेच रेडियो लावतानाची तिची ती मोहक लगबग..

त्या गाण्यातही फार सुंदर पाऊस दाखवला आहे.. मनमुराद कोसळणारा.. त्या अंधारलेल्या दुपारीही अगदी तसाच पाऊस पडत होता.. आणि माझी साधना, माझी वहिदा, माझी मधुबाला.. माझ्यासमोर बसली होती.. :)

छे हो.. आता कसली अकाउंटन्सी आणि कसलं ते Amalgamation of companies..? सब साले बहाने थे..!

ती मला आवडली होती आणि मी तिला आवडलो होतो.. बास्स.. इतकंच खरं होतं..

आता पाऊसही थोडा वाढला होता.. तिथे केळकरमावशीकडची भिशीही एव्हाना रंगली होती.. रेडियोवर दीदीचं 'ओ सजना.. ' सुरू होतं..

पुन्हा एक वाऱ्याची झुळूक आली.. आणि काही क्षण अकाउंटन्सीच्या पुस्तकांनी आपली पानं मिटून घेऊन आम्हाला फार नाही.. पण आयुष्यातल्या पहिल्यावहिल्या 'किस'करता थोडी मोकळीक दिली होती.. प्रायव्हसी दिली होती..!

'ओ सजना बरखा बहार आई..! '

गाणं असं ऐकावं, असं अनुभवावं, आणि आयुष्यभराकरता मर्मबंधात जतन करून ठेवावं..!

आज ती कुठे आहे हे मला माहीत नाही.. खरंच माहीत नाही.. पण हा छोटेखानी लेख खास तिच्याकरता..

God Bless You Dear.. Cheers..!

-- प्राध्यापक अभ्यंकर. :)

August 30, 2012

सादगीभरा धर्मेंद्र..

ही हकिगत असेल काहीतरी १४-१५ वर्षांपूर्वीची..

अजय विश्वकर्मा हा माझा एक भैय्या मित्र. लहानपणापासूनच अत्यंत हुशार.. दहावींनंतर व्हिज्युअल इफेक्ट्स, ऍनिमेशन, एडिटिंग वगैरे विषयात प्रावीण्य मिळवलंन आणि नंतर तो चित्रपट व्यवसायाशी जोडला गेला. तिथे काही वर्ष उमेदवारी करून पुढे त्याने अंधेरीला स्वत:चा एक छोटेखानी स्टुडियो सुरू केला. एक छोटीशी पूजा ठेवली आणि त्या पूजेचं त्याने मलाही निमंत्रण दिलं..

 "तात्या, बस थोडेही मेहेमान लोग आनेवाले है.. तुझे आना ही है.. बाद मे तुझे खाना खाकेही जाना होगा."

मी ठरल्यावेळेला तिथे पोहोचलो.. त्याने मला हौशीने त्याची यंत्रसामग्री वगैरे दाखवली.. फार नाही परंतु २०-२५ माणसंच तिथे आली होती.. मी दर्शन घेतलं, तीर्थ-प्रसाद घेतला. जरा वेळाने अगदी उत्तम भोजन झालं आणि अजयला मनापासून शुभेच्छा देऊन मी अजयचा निरोप घेऊ लागलो..

"तात्या, रूक जा थोडा टाइम. तुझे एक खास मेहेमान से मिलाना है.. अभी तक वह आए नही, लेकीन आएंगे जरूर...! "

कोण बरं हे खास मेहेमान? मग मीही तिथे जरा वेळ थांबून त्यांची वाट पाहू लागलो..

जरा वेळाने बघतो तर स्टुडियोच्या बाहेर एक पॉश गाडी येऊन उभी राहिली आणि त्यातून चक्क तुमचा-आमचा लाडका धर्मा मांडवकर, अर्थात धर्मेंद्र उतरला..! आपण तर साला जाम खूश झालो त्याला पाहून.. 

आतापावेतोवर बरीच मंडळी जेवून निघून गेली होती.. आम्ही अगदी मोजकीच माणसं मागे उरलो होतो.. मग धरमपापाजींनी दर्शन वगैरे घेतलं.

अजयने त्यांची माझी ओळख करून दिली.. "ये तात्या है. मेरा दोस्त है..आपका फॅन है. थाना मे रेहेता है.. " 

प्रसन्न हसत धरमपापाजींनी माझ्याशी हस्तांदोलन केलं.. मंडळी, खरं सांगतो, मला त्यांची ती हाताची पकड अजूनही आठवते.. भक्कम लोखंडी पकड..!

 "आप हमारे फॅन है. बहुत अच्छा लगा.. कौनसी फिल्मे पसंद है हमारी..?"

मग मी त्यांना फटाफट काही नावं सांगितली.. 'बंदिनी', 'ममता', 'अनुपमा', 'चुपके चुपके', 'गुड्डी', आणि अर्थातच वीरूचा 'शोले..!'

"वीरू पसंद आया आपको..? " :)

मग धरमपापाजी एकदम मोडक्यातोडक्या मराठीतूनच सुरू झाले..

"तू मराठी आहे ना..? मंग तुज्याशी मराटीतच बोलतो.. " "तुला खरं सांगू काय? तसा मी कोण ग्रेट ऍक्टर वगैरे बिल्कूल नाय रे.. पण तुमचा लोकांचा प्यार एवढा भेटला ना, म्हणून तर माझी आजवर रोजीरोटी चालली..! " 

अगदी हसतमुखपणे आणि प्रांजळपणे धरमपापाजी म्हणाले.. "इतके वर्ष इथे इंडस्ट्रीत हाय, पण तू माझा गुड्डी सिनेमा पाहिला ना? त्यात सांगितल्याप्रमाणे अजूनही मी स्वत:कडे त्रयस्थपणेच बघतो..'

"हमे अभी तक पुरी तरहसे राज नाही आयी ये फिल्मी दुनिया.. यकीन करो मेरा.. आप जैसे चाहनेवालो के आशीर्वाद से रोजीरोटी मिली, चार पैसे मिले.. लेकीन आज भी मै अपने आप को इस दुनिया से अलग मानता हू..! "

मग मला अचानक गुड्डी चित्रपटाअखेरचे त्याचे संवाद आठवले.. त्यात धर्मेंद्र फिल्मी दुनियेने वेडावलेल्या एका मुलीला - जया भादुरीला सांगत असतो.. "मी लहानपणी माझ्या शेतावर मस्त मोकळेपणाने उभं राहायचो तेव्हा मला किती सुरक्षित वाटायचं..पण इथे सगळं वेगळंच आहे.. जो पर्यंत तुम्ही प्रकाशझोतात आहात तोवर तुम्हाला लोक विचारतात.. नंतर तुमची अवस्था एका जळालेल्या स्टूदीयोतल्या एखाद्या मोडक्या दिव्यासारखी होते.. तो दिवा ज्याने त्या स्टुडियोत अनेकांचे चेहरे उजळले..! "

आज मला पुन्हा एकदा धरमपाजींचा हा संवाद आठवला. परवाच ए के हंगल वारले.. किती बॉलीवुडवाले होते त्यांच्या मयताला..? तीनशे-तीनशे करोडवाल्या सलमान-शाहरुखचा जमाना आहे.. कात्रिना, करीना, प्रियांकाचा जमाना आहे.. हंगलसाहेबांना कोण विचारतो? किसको टाइम है..?!

अजयच्या स्टुडीयोत मला भेटलेले धरमपापाजी मात्र मला गुड्डीतल्याइतकेच साधे आणि माणुसकी जपलेले वाटले, सादगीभरे वाटले..


धरमपापाजी.. हेमामलिनीचे "स्वत:..!" (शब्दश्रेय : रमाबाई रानडे! ) :)

जरा वेळाने मी तेथून निघालो... त्यांच्या पाया पडलो.. त्यांनी पुन्हा एकदा मला "अरे अरे.. बस बस.. " असं म्हणून उठवला.. हात मिळवला.. "बेटा, ऐसाही प्यार रहे.. आप है तो हम है..! "

घरी परतताना त्यांच्या हाताची लोखंडी पकड जाणवत होती.. डोळ्यासमोर त्यांचा प्रसन्न चेहरा होता..

- तात्या अभ्यंकर.

April 14, 2012

मुडदा शिंपी भिवा..!

सारं काही तेच ते अन् तेच ते..! विंदांची कुठलीशी कविता आहे म्हणे ही. इथेही तसंच आहे. तोच तो मुंबैचा फोरास रोड. तोच तो तिथला झमझम देशी दारूचा बार अन् तोच तो तिथला कॅशियर तात्या..!

सायंकाळचे वाजले असतील सताठनऊ.. तात्या बारच्या गल्ल्यावर बाटल्यांचा हिशेब करीत बसला होता. बारमधली मंडळी निवांतपणे पीत होती. शिव्या ओव्या गप्पा सुरू होत्या. नेहमीचाच रूटीन कार्यक्रम सुरू होता..

"ए तात्या भडव्या चकणा दे ना..केव्हापासनं मागतोय कोण ऐकायला कबूल नाय..!"

कुणा गिर्‍हाईकाने मला छानशी शिवी दिली होती.. मीही लगेच दुसरी एक सणसणीत शिवी हासडून बारच्या पोर्‍याला त्या इसमाला चकणा द्यायला सांगितला. पोर्‍याने माझी शिवी खाताच त्या इसमाम्होरं चणे नेऊन ठेवले..

'कोण हा मला नावानिशी ओळखणारा? तसा मी त्या फोरासरोडवर 'तात्यासाब' म्हणून प्रसिद्ध होतो. पण आता येथे येणारी नियमित गिर्‍हाईकंही मला वळखू लागली होती म्हणायची! पण हा चक्क मराठीत एकेरीवर येऊन मला 'तात्या..भडव्या..' अशी फुलं वाहणारा कोण?

ती संध्याकाळ तशीच मावळली. पुन्यांदा दोन्चार दिसात पुन्हा तो शिवी देणारा बारमध्ये पियाला आला. तो आला. टेबलापाशी बसला. जीएम डॉक्टरचा त्यानं फुल्ल खंबा मागवला. मग मीच पुन्हा शिवी खायच्या आत चपळाईनं थोडे चणे अन् भाजलेला पापड घेऊन त्याच्या टेबलापाशी गेलो..

"सॉरी बॉस.. परवा चुकून शिवी गेली तोंडातनं.. काय सांगू, डोकं जाग्यावर नसतं.." असं म्हणून तो थोडासा ओशाळा हसला..

त्याच क्षणी मला तो आवडला अन् मीही त्याच्या टेबलापाशी त्याच्यासमोर बसलो..त्याला गप्पात रंगवायचा यत्न करू लागलो. लौकरच त्यात मला यश आलं..

हा कोण? कुठला? याची उत्तरं मिळतील अश्या बेतानं त्याच्यासोबत गप्पा विणू लागलो. जी एम डॉक्टरचा पयला पेग भर्कन संपवला गड्यानं.. दुसरा पेग सुरू झाला. अधुनमधुन मी गल्ल्यावर जात होतो, तिथलीही कामं सांभाळत होतो..

भिवा शिवराम लोहारी असं कायसंसं त्याचं नाव मला समजलं..

"ए तात्या, मढ्याच्या टाळूवरचं लोणी खातो मी.. मा***द..!" भिवाच्या डोळ्यात आता पाणी होतं. स्वतःलाच त्यानं चांगली पंचाक्षरी छप्पर उडवणारी शिवी घातली होती..

"का रे बाबा? काय झालं..? रडतोस का? मला सांग की.."

माझ्या प्रश्नातली आपुलकी त्याला भावली असावी. त्यानंतर भिवा माझ्याशी बोलू लागला.. मोकळा झाला.

मुंबै शहर.. लाखोंच्या वस्तीचं.. हार्बर, मध्य व पश्चिम अश्या तीन तीन रेल्वेचं जाळं असलेलं. इथे हप्त्याला किमान सताठ रेल्वे अपघात ठरलेले... त्यात बरेचसे भिकारी-टाकारी, तर बरेचसे अगदी चांगल्या घरचेही. कुणी डोकं खांबाला आपटून चालत्या गाडीतनं पडलेले, कुणी जीव दिलेले, कुणी धावती गाडी पकडताना प्लॅटफॉर्मखाली गेलेले तर कुणी घाईघाईत रेल्वे रूळ ओलांडताना गाडीखाली आलेले..!

सर्वांवर उपाय एकच. पोलीस मयत व्यक्तीला त्याच्या तुटक्या अवयवांनिशी नजिकच्या मुल्शिपाल्टीच्या नायर/सायन/केम/कस्तुरबा इत्यादी रुग्णालयात पोचवतात. अन् तिथूनच नेमकं भिवाचं काम सुरू होतं.. ज्या डेडबॉडीज विविध रुग्णालयात पोहोचवल्या जातात, भिवा त्या सार्‍या रुग्णालयातला व्हिजिटिंग/फ्रीलान्सर मुडदा-शिंपी आहे.. !

एक जाडसर दाभण घेऊन त्याच्यात त्याच जाडीचा भक्कम दोरा ओवून प्रेतांचे तुटलेले हात-पाय-मुंडकी टेंपरवारी किंवा नेणार्‍याला बॉडी एकसंध नेता येईल इतपत शिवणे व त्या बदल्यात संबंधित रुग्णालयातून/मृतांच्या नातेवाईकांकडून पैसे घेणे हेच भिवाचं काम, त्याचं उत्पन्नाचं साधन, त्याचं मानधन, त्याची बिदागी...!

"काय करशील तात्या, हे काम पण कुणीतरी केलंच पायजेल ना? आपण करतो..!"

ती संध्याकाळही तशीच संपली.. पण भिवा हप्त्यातनं तीन्चार दिस तरी बारमध्ये येतच होता. "तात्या, फोकलीच्या आज आम्लेट मागव ना. पण तुझ्या पैशाने हां.!"," तात्या, तुझ्याकरताही मागवू का रे आज एक खंबा"? असे आमचे दोस्तीतले संवाद सुरू झाले, हायहॅलो सुरू झालं.. माझी अन् भिवाची वेव्हलेंथ जमली.. भिवा यायचा, तासभर बसायचा.. कधी रडायचा, कधी फुल्ल टाईट झाल्यावर काहीतरी कारणाने कुणाला तरी जाम शिव्या द्यायचा..

मध्यम उंची, कुरूप चेहरा..साधेसुधे कधी बरे तर कधी मळके कपडे, साफ हडकुळा..वगैरे वगैरे. हे भिवाचं वर्णन.. पण चेहरा मात्र विलक्षण बोलका..!

" तात्या, तुझ्याकरताही मागवू का रे आज एक खंबा?"

"नको रे. मी देशी पीत नाही.."

थोड्या वेळाने भिवा टाईट. "मायझंव, इंग्लिश मागवू का तुझ्याकरता? पी ना रे फुकनीच्या.. आज दोन दोन पाय शिवलेत.. एकेका पायाचे तीन-तीनशे रुपये भेटलेत..!"

एकेका पायाचे तीन-तीनशे रुपये भेटलेत..???????????????????

"तात्या, एक लै भारी मालदार पार्टी होती रे ती.. काय कसा माहीत पण त्यांचा तरुण पोरगा गाडीखाली आला रे.. अरे भल्या घरची माणसं होती रे ती.. मुलाचा बाप/भाऊ/काका/मामा अन् कोण कोण.. सारीजण बॉडी न्यायला आल्ते रे पोराची.."

"मग..?"

"मग काय? ते आले तेव्हा मी नायरच्या मॉर्गमध्येच होतो. पोस्टमॉर्टेम होऊन त्या पोराची ताजी बॉडी नुकतीच आणून ठेवली होती मॉर्गमध्ये.. सोबत तुटलेले दोन पाय..! भडवीचं कार्ट कसं काय ट्रेनखाली आलं असणार कोण जाणे..!"

मी बगितलं.. पार्टी भली होती, पैशेवाली पण वाटत होती. मग त्या पोराचा कोण काका की मामा आत आला. बॉडीची ओळख पटवून बॉडी पायजेल म्हणाला. मी म्हटलं "घ्या ही बॉडी अन् ते पाय..!"

"नेहमीचा अनुभव रे तात्या.. तुला काय लेका, तू मस्त इथे बारमध्ये गल्ल्यांवर बसलेला असतोस..!"

दुनियेत सगळं सापेक्ष आहे मंडळी.. मला तेव्हा माझा कुणी सखा-सवंगडी सी ए होऊन त्याच्या एसी हापिसात बसलेला असतो त्याचा हेवा वाटतो, तर भिवाला माझा हेवा वाटतो..!

"बॉडी शिवायचे पैशे होतील.." भिवानं सुचवलं अन् एक पाय शिवायचे तीनशे रुपये या प्रमाणे दोन पायाचे सहाशे असा सौदा ठरला..!

"एक पाय शिवायचे तीनशे रुपये? अरे शिवणारा काय एकच पाय शिवून घेईल का?" मला विनोदीच वाटला तो प्रकार..

"आमच्यात असाच रेट सांगतात..!"

पण त्या दिवशी मात्र भिवा जामच अस्वस्थ वाटला..

"तात्या, मला पचतील का रे हे सहाशे रुपये? पण मी काय करू? मी माझं काम केलं आहे.."

सारं काही भिवाच बोलत होता..!

मला नेमकं काय बोलावं ते सुचत नव्हतं..

"अरे तात्या, तसा मी या कामाला चांगला सरावलो आहे. आजवर इतक्या बॉड्या शिवल्या की आता या कामाचं काही वाटत नाही. शिवायचे पैशेपण घेतो चांगले.. पण कधी कधी लैच त्रास होतो.."

थोडा वेळ तसाच गेला.. भिवाने बाटली संपवली.. बेभान टाईट झाला अन् तिथेच भडाभडा ओकला..!

मी काहीच बोललो नाही.. बारच्या पोर्‍याला सांगून ते सगळं साफ करून घेतलं.. भिवाच्या चेहेर्‍यावर सोडा मारला. अजूनही भिवा टाईटच होता..बरळत होता -

"तात्या, मला नाय पचले रे ते सहाशे रुपये.. ओकून पडले बघ! भांचोत, त्या पोराच्या बापाचा चेहरा डोळ्यासमोर दिसतो. पोरगंही गोड होतं रे.."

का माहीत नाही, पण भिवाचा माझ्यावर लोभ होता..एकदा केव्हातरी मी चिंचपोकळीला असणार्‍या त्रिवेणीसदन या त्याच्या चाळीतही गेलो होतो. भिवानं तेव्हा माझ्याकरता इंग्लिश मागवली होती..!

त्यानंतरही भिवा बारमध्ये येतच गेला, येतच गेला..

कधी कुणाचा पाय शिवून, तर कधी हात शिवून तर कधी पायाची जोडी किंवा हाताची जोडी शिवून व जोडीच्या हिशेबात पैसे घेऊन...!

- तात्या अभ्यंकर.

April 02, 2012

मैने तेरे लिये ही...

मैने तेरे लिये ही.. (येथे ऐका)

बाबूमोशाय अमिताभ, रमेश देव-सीमा, नोकर परंतु घरात एखाद्या वडीलधाऱ्यासारखा मान असणारा कुणी रामुकाका आणि राजेश खन्ना ऊर्फ आनंद सेहगल..


छान, सुंदर कौटुंबिक घरगुती वातावरण. असं घरगुती वातावरण तुमच्या-आमच्या घरातही अगदी सहज दिसू शकतं. आणि तुमच्या-आमच्या जीवनातल्या अशा साध्यासुध्या, आपुलकीच्या गोष्टी पडद्यावरही अगदी सहजसुंदरतेने दाखवणं हेच तर हृषिदांचं वैशिष्ट्य..!

आनंद सेहगल गाणं म्हणतो आहे - 'मैने तेरे लिये ही सात रंग के सपने चुने..'

छोटी बाते, छोटी छोटी बातों की है यादे बडी..!

ही खूप मोठी गोष्ट सांगतो आहे आनंद सेहगल. "बाबूमोशाय, जिंदगी लंबी नही, बडी होनी चाहीये..! " -- असं म्हणणारा आनंद सेहगल. पण बाबूमोशायच्या चेहऱ्यावर कुठेतरी उदासी आहे. त्याला आनंदचं मरण स्पष्ट दिसतंय..!

दिल्लीहून उपचारांकरता मुंबईला आलेला आनंद सेहगल. आयुष्य भरभरून जगणारा, माणसांचा वेडा आनंद सेहगल. 'रोगाचं नाव असावं ते देखील कसं भारदस्त असावं..!', असं म्हणून आपल्याला Lymphosarcoma of the intestine झाला आहे असं सांगणारा आनंद सेहगल..!

मौत तू एक कविता है
मुझसे एक कविता का वादा है मिलेगी मुझको.. -- असं म्हणणारा आनंद..!

मुकेशचा हळवा, गोड गळा - सलीलदांचं संगीत, उत्तम कथा-पटकथा-अभिनय.. सारंच क्लासिक..

हृषिदा, तुम्ही प्लीज परत या हो.. तुमच्यासारखी माणसं सिनेजगताला कायमस्वरूपी हवी आहेत..!

"आनंद मरा नही, आनंद मरते नही..! "

हेच खरं..!

-- तात्या अभ्यंकर.

March 28, 2012

पंथी हू मे उस पथ का..

तो गायक होता,
तो गवई होता,
तो रंगीला होता,
तो रसीला होता,
तो दर्दभरा होता,
तो गोड होता,
तो कमालीचा सुरेल होता,
तो लयदार होता,
तो पेचदार होता,
तो अष्टपैलू होता,
तो अवलिया होता,
तो एकमेवाद्वितीय होता,
तो जीनियस होता...!

हम जवान थे उन दिनोंकी बात है! माझ्या महाविद्यालयीन आयुष्याचे ते दिवस होते. वर्ष १९८७. असेन बहुधा तेव्हा एफ वाय किंवा एस वाय बी कॉमच्या वर्षाला. केट्या नेहमीच पडत त्यामुळे नक्की कितवीत होतो ते आता आठवत नाही. सुरांची आवड अगदी लहानपणापासून.. गाणं ऐकत होतो, मधुकरवृत्तीने टिपत होतो, कुणा भल्या गुणीजन मंडळींच्या पायाशी बसून कधी कधी शिकतही होतो. सूर म्हणजे काय, लय कशाला म्हणतात ही न सुटणारी कोडी उलगडण्याचा प्रयत्न करत होतो. दिवस मोठे मजेत जात होते. कालेजच्या उपाहारगृहातील माझ्या भसाड्या मैफली, गप्पाटप्पा, सतत मित्रमैत्रिणींच्या गराड्यात असे मी. भारूनच जाण्याचे दिवस होते ते!त्या दिवसात अखंड साथ होती ती त्याच्या गाण्यांची! (तशी ती अगदी आजही आहे म्हणा!)

जाने क्या सोचकर, मंजिले अपनी जगह, मुसाफिर हू यारो, आनेवाला पल जानेवाला है, मे शायर बदनाम, ये क्या हुआ, कुछ तो लोग कहेंगे, किसका रस्ता देखे, रातकली एक ख्वाब मे, पग घुंगरू बांधकर, हम है राही प्यार के, एक लडकी भिगी भागीसी......... यादी खूप मोठी आहे!

दिवसेंदिवस मी त्याच्या प्रेमात आकंठ बुडत होतो. आणि बस! ठरवून टाकलं एके दिवशी. साला जायचंच एकदा त्याला भेटायला. एकदा तरी पायावर डोकं ठेवायचं याच्या! बस, ठरलं...!

"आपण जाणार त्याच्या घरी त्याला भेटायला..! जाहीर करून टाकलं दोस्तलोकांत!

"तो खूप व्हिम्झिकल आहे", "तिथे तुला कोण ओळखतो? हाकलून देतील...!" इत्यादी बर्‍याच गोष्टी ऐकाव्या लागल्या. पण आपला इरादा पक्का होता. मुंबईत राहून त्याच्यासारख्या फिल्मी हस्तीचा पत्ता मिळणं मुळीच अवघड नव्हतं. जुहूचा पत्ता होता.

तो बहुधा १९८७ सालातला जानेवारी महिना होता. रविवारी ध्वनिमुद्रणं नसतात त्यामुळे साहेब घरी भेटतील असा भाबडा अंदाज बांधून एका रविवारी पोहोचलो एकदाचा जुहूला. जुहूतारा रोडवरील त्याचा बंगलाही अगदी लगेच सापडला. मुख्य द्वार खुलंच होतं. तसाच आत घुसलो. 'तो अत्यंत कंजूष आहे त्यामुळे रखवालदार वगैरे ठेवत नाही..' हे ऐकून होतो ते खरं होतं. दारावर मला अडवायला रखवालदार वगैरे कुणीही नव्हतं. बंगल्याच्या आवारात शिरलो. डावीकडेच 'चलती का नाम गाडी' शिणेमातली "बाबू, समझो इशारे.." या गाण्यातली ती गाडी उभी होती! एका क्षणात 'चलती का नाम गाडी' सिनेमातली काही दृश्य माझ्या डोळ्यासमोरून गेली! मी मनातल्या मनातच त्या गाडीला आदाब केला.

कधी काळी त्या गाडीत मधुबालाही बसली होती..!

बंगल्याच्या मुख्य दारापाशी गेलो, टकटक केली. आतून कुणा एका अत्यंत तिरसट माणसाने दरवाजा उघडला, तिरस्कार भरल्या नजरेने माझ्याकडे पाहिलं.

"क्या है..?" भसाड्या आवाजात जोरात खेकसलाच तो इसम माझ्यावर.

"किशोरदासे मिलना है. मै उनका फॅन हू.."

"वो घरपे नही है...बाद मे आओ.." असं म्हणून मी पुढे काही बोलायच्या आत फाडकन दार बंद केलं त्या इसमाने!

झालं! आमची ठाणा ते जुहू ही खेप एका क्षणात फुकट गेली होती. मित्रांच्यात हसं झालं. पण मला या सगळ्याचं काहीच वाटलं नाही. त्याच्यावरील माझी श्रद्धा तसूभरही कमी झाली नाही! मी त्याच्या घरी गेलो म्हणजे त्याने मला भेटलंच पाहिजे असा काही नियम नव्हता. अक्षरश: करोडो चाहते होते त्याचे, त्यापैकीच मी एक..!

१९८७ सालचाच एप्रिल महिना होता बहुधा. त्याच्याबद्दलचं आमचं प्रेम पुन्हा एकदा उफाळून आलं. एका रविवारी पुन्हा एकदा उठलो आणि तडक जाऊन थडकलो जुहूला! परत सगळा तोच सीन. मी बंगल्याच्या दरवाज्यावर टकटक केली. दोन पाच मिनिटं कुणीच दार उघडलं नाही. पुन्हा एकदा बेल मारली. आणि....

खुद्द आमच्या भगवंतानेच दार उघडलं! मी आनंद, आश्चर्य, इत्यादीमुळे थक्क. हिंदी चित्रपट संगीताच्या दुनियेतील बादशहा उभा होता माझ्यासमोर! पोशाख - टीशर्ट आणि हाफ प्यॅन्ट! क्षंणभर मला काय बोलावं ते कळेना.

"हम्म! बोलो?"

"आपका फॅन हू. आपसे मिलना था एक बार!" मी अडखळत, बिचकतच पुटपुटलो कसाबसा..!

"हम्म! मिल लिये? बहोत मेहेरबानी आपकी. दुबारा जरूर आना..."

इतकं म्हणून गुरुदेव पुन्हा आत निघून गेले! फरक इतकाच की मागल्या वेळच्या त्या माणूसघाण्या इसमाप्रमाणे या वेळेस माझ्या तोंडावर थाडकन दार नाही लावलं गेलं! आता बाहेर मी पुन्हा एकटाच उभा!

पुन्हा एकदा ठाण्याच्या वाटेला लागलो. पण या वेळेस प्रचंड आनंदात होतो. त्याचं दर्शन झालं होतं! सार्‍या जगातल्या काही मोठ्या गायकांपैकी एकाला मी भेटलो होतो काही क्षणांपूर्वीच.. त्या आनंदात मी घरी आलो. मित्रांना सगळी हकिकत सांगितली.

"अरे तात्या, काय तू पण? का जातोस त्याच्या घरी असा वारंवार अपमान करून घ्यायला? अरे एक नंबरचा चमत्कारिक आणि व्हिम्झिकल इसम आहे तो. आलेल्या पाहुण्यांवर कुत्रं काय सोडतो, लुंगी नेसून दात घासत घासत रेकॉर्डिंगकरता काय जातो!
अरे त्याच्या व्हिम्झिकलपणाच्या इतक्या कथा प्रसिद्ध असताना तू पुन्हा पुन्हा का जातोस त्याच्या घरी? तुला काही स्वाभिमान वगैरे आहे की नाही?"

त्याच्यापुढे कसला आलाय स्वाभिमान? ज्याच्या सुरांनी, लयतालांनी माझ्या आयुष्याचे अनेक क्षण समृद्ध केले त्याच्यापुढे कसला आलाय माझा मान नी अभिमान? होती ती फक्त कृतज्ञतेची भावना आणि भक्ति! त्याच्या व्यक्तिगत आयुष्यात असेना का तो चमत्कारिक! पण मंडळी, विश्वास ठेवा, सच्च्या भक्तीचं फळ केव्हा ना केव्हातरी मिळतंच. तो अनुभव मला पुढे लौकरच आला. १९८७ सालचाच जुलै किंवा ऑगस्ट महिना असेल!

एका रविवारी आम्ही आपले पुन्हा एकदा जुहूला जायला सज्ज!

बंगल्याच्या दारावर टकटक केली. कुणा पोरसवदा नोकराने दार उघडलं. घरात घेतलं. मी काही बोलायच्या आतच दिवाणखान्यात असलेल्या एका सोफ्याकडे बोट दाखवत 'बसा.. 'असा इशारा करून तो पोरगा कुठेतरी आत निघून गेला. मी दिवाणखान्यातल्या त्या सोफ्यावर बसलो. समोरच्याच भिंतीवर दादामुनी, अनुपकुमार आणि किशोरदा या तिघांचाही मनमुराद हसतानाचा एक भलामोठा कृष्णधवल फोटो टांगलेला होता. साला, तो फोटो पाहूनच आपला दिल खुश झाला. फारच सुरेख फोटो होता तो! समोरच अजून एक सोफा होता. त्यावर एक हार्मोनियम ठेवली होती.

दोनच मिनिटात त्या मुलाने माझ्या पुढ्यात पाणी आणून ठेवले, चहाचा कप ठेवला आणि तो मुलगा पुन्हा एकदा अदृश्य झाला! च्यामारी, घरातल्या मालकाप्रमाणेच त्याची नोकरमंडळीही बर्‍यापैकी व्हिम्झिकल दिसत होती!

मी पुढ्यातला चहा संपवला. अर्धा तास तिकडे कुणीच आलं नाही की गेलं नाही. मी आपला तसाच त्या सोफ्यावर बसून होतो. थोड्या वेळाने मात्र माझं भाग्य उजळलं. वरच्या मजल्यावरच्या जिन्यावरून किशोरदा स्वत:च खाली येत होते. यावेळी झकाससा अंगरखा आणि लुंगी असा पोशाख होता गुरुजींचा! हातात कागदांची कसली तरी चळत होती. ते कागद चाळत चाळतच गुरुजी खाली उतरले आणि माझ्या पुढ्यातल्या सोफ्यावर येऊन त्या हार्मोनियमच्या शेजारी बसले. पुन्हा पाचदहा मिनिटं तशीच गेली. त्यानंतर त्यांचं लक्ष माझ्याकडे गेलं.

"बोलो भाई, क्या काम है?"

या वेळेस मूड जरा बरा दिसत होता. मी पुन्हा 'आपका फॅन हू, आपसे मिलने आया हू.." असं म्हणत उठलो अन् डायरेक्ट त्यांच्या पायावरच डोकं ठेवलं!

"अरे अरे बस बस.."

"आओ बैठो.." असं म्हणून माझा हात धरत मला उठवलं व सोफ्यावर बसवलं.

तो मगासचा मुलगा पुन्हा एक अवतीर्ण झाला. आता त्याच्या हातात चहाचे दोन कप होते. एक किशोरदांपुढे आणि एक पुन्हा माझ्या पुढ्यात

"चाय पी लो बेटा..! कहासे आये हो? क्या सुनोगे?" असं म्हणून त्यांनी आता समोरची हार्मोनियम उघडली!

मी अक्षरश: हवेत तरंगत होतो. काहीच उत्तर देऊ शकलो नाही. किशोरदांनी चहाचा एक घोट घेतला. पेटीवर हात टाकला, काही कॉर्डस वाजू लागल्या आणि पंथी हू मै उस पथ का, अंत नही जिसका.. (मूळ गाणं आपण इथे ऐकू शकाल)

या गाण्याच्या ओळी अत्यंत अप्रतिम गुणगुणू लागले.

"इस पथ पर देखे कितने, सुखदुख के मेले
फूल चुने कभी खुशियोके, कभी काटोसे खेले..
जाने कब तक चलना है मुझे इस जीवन के साथ...!

मंडळी, खरंच काय वर्णन करू त्या सुरील्या दर्दभर्‍या आवाजाचं? शब्द अपुरे पडतात! एकच सांगतो मी त्या क्षणी माझ्या पत्रिकेतले सगळे ग्रह, सगळी नक्षत्र, कुठल्या कुठल्या ग्रहांच्या युत्या, या सगळ्याच गोष्टी फार उच्चीच्या होत्या. अक्षरश: जगभर प्रसिद्ध असलेला किशोरदांसारखा अवलिया गवई त्या क्षणी फक्त माझ्या एकट्याकरता गात होता..!


मी भारवलेल्या अवस्थेतच तेथून बाहेर पडलो!

क्षणभर मान्य करू की सुरवातीला लागोपाठ दोन वेळा माझा त्या घरात अपमान झाला. परंतु त्या दिवशी त्याच घरात माझा जो सन्मान झाला होता त्याचं मोल कशात करणार?

पण पुलंनी रावसाहेब रंगवताना लिहूनच ठेवलं आहे. "आमची आयुष्य समृद्ध करण्याकरता देवाने दिलेल्या मोलाच्या देणग्या या न मागता दिल्या होत्या, न विचारता परत नेल्या!

शेवटी त्याप्रमाणेच झालं."कभी अलविदा ना केहेना.." असं म्हणणार्‍या हिंदी सिनेसृष्टीच्या या अनभिषिक्त बादशहाने तुम्हा-आम्हाला मात्र शेवटचं अलविदा केलं! तारीख १३ ऑक्टोबर १९८७...!

किशोरदांना निरोप द्यायला माणसांचा महासागर उसळला होता. त्या गर्दीतच एक मीही होतो...! रडवेला झालेला त्यांचा एक चाहता! किशोरदांनी हार्मोनियमच्या सुरांच्या संगतीत त्यांच्या घरी ऐकवलेलं "पंथी हू मे उस पथ का.." हे गाणं मला त्या अफाट गर्दीतही माझ्या कानात रुंजी घालत होतं...!

-- तात्या अभ्यंकर.

March 15, 2012

एकवार पंखावरुनी...



सात्विकता म्हणजे काय, गोडवा म्हणजे काय मन:शांती म्हणजे काय, हे सारं सार या गाण्यातनं कळतं..
हे गाणं ऐकलं की आपण आईच्या मांडीवर डोकं ठेवून आहोत आणि आई डोक्यावर छानसं खोबरेल तेल थापते आहे अस काहीदा वाटून जातं..

'वने माळरानी राई
ठायी ठायी केले स्नेही'

याला म्हणतात यमन..!

'तुझ्याविना नव्हते कुणी आत अंतरात..!'

ही यमनकल्याणातली भक्ती..!

बाबूजींच्या स्वरातील आर्ततेविषयी, रसाळतेविषयी, गोडवेपणाविषयी मी काय बोलू..?

कुठे गेली आता अशी गाणी..?!

-- तात्या अभ्यंकर.

March 12, 2012

एकदाच यावे सखया...

एकदाच यावे सखया.. (येथे ऐका)

अशोकजी परांजपेंचे सुंदर शब्द असलेलं अशोक पत्की, सुमनताईंचं एक सुरेख गाणं. साधीच परंतु अत्यंत सात्त्विक अन् गोड चाल आणि सुमनताईंचा तितकाच गोड आणि हळवा गळा. 'सखया' हा शब्द खूप म्हणजे खूपच सुरेख!

पुन्हा गूज अंतरीचे हे कथावे व्यथांनी.. - ही ओळ खूप काही सांगणारी.

मध्यंतरीच्या काळात कुठेतरी अंतर पडले आहे, ते दूर व्हावे आणि पुन्हा एकदा तुझे गीत कानी यावे आणि 'भाव दग्ध विटला हा रे, पुन्हा फुलुनि यावा...!'

'पुन्हा फुलुनि यावा...' या ओळीतील पत्कीसाहेबांच्या अत्यंत हळव्या सुरावटीचं सुमनताईंनी अगदी सोनं केलं आहे. ही जागा त्यांच्या गळ्यातून इतकी सात्त्विकपणे उतरली आहे की क्या केहेने..! 'धुंद होऊनी मी जावे..' ही सुरावट देखील तशीच सुरेख...

प्रेमगीतातील ही सात्त्विकशीलता आणि मर्यादशीलता हल्लीच्या काळात क्वचितच पाहायला मिळते. कितीही जरी निरनिराळ्या राजसी-तामसी पाककृती असल्या, आपण त्यांचा वेळोवेळी आस्वाद घेतला तरी अहो शेवटी केळीच्या पानावरील साधा गरमागरम वरणभात, सोबत साजून लोणकढं तूप याला जशी सर नाही ना, तसंच या गाण्याचं आहे. अखेर कुठेतरी तुम्हाला निवारा मिळेल आणि तुमचं मन शांत होईल ते 'एकदाच यावे सखया', 'केतकीच्या बनी', 'तिन्ही सांजा सखे मिळाल्या' किंवा विठ्ठला तू वेडा कुंभार..' याचसारख्या गाण्यांमधून..!

पण आमचं हल्ली असं झालंय की आम्हाला 'कोलावरी डी..' सारखी गाणी हेच काय ते उच्च संगीत वाटतं आणि याचं कारण म्हणजे हल्लीच्या बाजारबसव्या वाहिन्या अशीच गाणी अगदी सतत तुमच्याआमच्या वर लादत असतात..


मग माझ्यासारखा नॉस्टालजियाने पछाडलेला एखादा खुळा उठतो आणि 'एकदाच यावे सखया..' या सारख्या गोड, अवीट गाण्याबद्दल आपलं मन मोकळं करतो इतकंच..!

-- तात्या अभ्यंकर.

March 09, 2012

झन झन झन झन पायल..

झन झन झन झन पायल.. (येथे ऐका)

पं मल्लिकार्जून मन्सूर..!

काय बोलू मी त्यांच्याबद्दल..? सिंहगडावरच्या देवटाक्याच्या पाण्याइतकाच स्वच्छ, शुद्ध, निर्भेळ आणि सात्विक माणूस. गवई म्हणून जितका मोठा, त्याहूनही अधिक एक सहृदयी माणूस..!

सोबत मन्सूरअण्णांच्या नटबिहागाचा दुवा दिला आहे. दूरदर्शनवरील कुठल्याश्या कार्यक्रमातील हे ध्वनिमुद्रण आहे. मन्सूरअण्णांना नटबिहागाची फर्माईश केली गेली आहे आणि अक्षरश: पुढच्याच क्षणी मन्सूरअण्णांनी 'झन झन झन झन पायल..' ही बंदिश सुरू केली आहे. गाण्यातली सिद्धीच म्हटली पाहिजे ही..! अगदी पहिल्या स्वरापासून, पहिल्या समेपासूनच गाण्यात रंग जमवण्याची विलक्षण हातोटी या कलाकाराला लाभली होती.
गाण्याच्या सुरवातीलाच,

झन झन झन झन पायल मोरी बाजे
जागे मोरी सास ननदिया
और दोरनिया जठनिया..

असं म्हणताना मन्सूरअण्णा 'जठनिया' शब्दावर जी काही तानकृती करून समेवर येतात ते श्रोत्यांना अक्षरश: अचंब्यात पाडतं. त्यानंतर मध्यलयीच्या त्रितालात जमवलेल्या लहानश्या आलापातून, ताना-हरकतीतून प्रत्येक वेळेला 'झन झन झन झन..' चा मुखडा पकडून समेवर आलेले मन्सूरअण्णा..! अभिजात संगीतातील क्लिष्टपणा वगळून ते रंगतदार करणं ते हेच..!

सुरवातीची काही वर्ष ग्वाल्हेर गायकीची उत्तम तालीम लाभलेल्या मन्सूरअल्यांनी त्यानंतर भुर्जिखासाहेबांकडून जयपूर गायकीची रीतसर तालीम घेतली आणि त्यावर हुकुमत मिळवली. गोड, सुरीला गळा, दमसास, गाण्यातील लयदारपणा, बुद्धीवाद, तानेतील पेचदारपणा, नारायणराव बालगंधर्वांचे संस्कार असलेली-गळ्यात कुठेही अटकाव नसलेली पेचदार, लचिली परंतु अत्यंत सुरीली, दाणेदार अशी तान, सहजसुंदर असा तार षड्ज ही मन्सूरअण्णांच्या गायकीतील मर्मस्थळं, शक्तिस्थळं..!

MM

आणि या सार्‍याच्या उपर त्यांच्या गाण्यातील सहजता.. अगदी सहज एखाद्याशी गप्पा माराव्यात, काही संवाद साधावा अशी गायकी. असं वाटतं की मन्सूरअण्णा गात नाहीयेत तर आपल्याशी मस्त बोलताहेत, तो राग सहज सोपा करून समजावून सांगताहेत, त्यातली सौंदर्यस्थळं अगदी जाता जाता उलगडून दाखवताहेत..!
मन्सूरअण्णांच्या गायकीचे वरील वर्णन आणि त्यांचे गाणे एखाद्याला खूप साधे आणि सोपे वाटेल, परंतु त्यामागे असलेली त्यांची विद्या ही अतिशय अवघड आहे, दुर्लभ आहे हेही लक्षात घेतले पाहिजे..!

वयाची ऐशी ओलांडल्यानंतर कपाळावर भस्माचे पट्टे ओढलेला हा शुद्ध सात्विक देवाघरचा शैव एके दिवशी खरंच देवाघरी निघून गेला आणि हिंदुस्थानी रागसंगीताचा हा उत्साहाचा झरा कायमचा आटला..!

असो..

अशी माणसं एखाददाच होतात, पुन्हा पुन्हा होत नाहीत हेच खरं..!

-- तात्या अभ्यकर.

March 01, 2012

तुपगुळपोळीची गुंडाळी..:)

श्रीमती किशोरी आमोणकर यांचे श्री. दत्ता मारुलकरलिखित चरित्र "गानसरस्वती" 
या पुस्तकाला श्री विनय हर्डीकर यांची प्रस्तावना आहे. त्या प्रस्तावनेत श्री विनय हर्डीकर यांनी म्हटले आहे,

"गेल्या पन्नास वर्षातल्या कंठसंगीतामधल्या नायक (गायक नव्हे) कलाकारांची नावे द्यायला एका हाताचीच बोटे पुरेत. श्रीयुत मल्लिकार्जुन मन्सूर, उस्ताद अमीर खां, पंडित कुमार गंधर्व, श्रीमती किशोरी आमोणकर आणि पंडित जितेंद्र अभिषेकी एवढी नावे घेतल्यावर बाकी सगळी नावे सहाव्या बोटावर येतात. "

श्री. हर्डीकर यांच्या मते नायक कलाकार म्हणजे "शिस्त मोडायची नाही पण नावीन्य आणि वैचित्र्य यांची मागणी पुरवून शिवाय संगीतामध्येही भर घालायची" हे करणारे कलाकार.

श्री हर्डीकरांच्या वरील विधानांचा विस्तृत समाचार घ्यावा व त्या निमित्ताने एखादा
संगीतविषयक लेखच प्रसिद्ध करावा या हेतूने हे लेखन करत आहे. वरील विधाने
हे केवळ निमित्त आहे, परंतु एकुणातच आजकाल अभिजात संगीतातील आवश्यक ठरत
चाललेल्या तथाकथित (सो कॉल्ड) नावीन्याबद्दल जो काही डांगोरा पिटला जात
आहे त्याबद्दलही आम्हाला काही भाष्य करावयाचे आहे.

एक गोष्ट मात्र सुरवातीलाच कबूल करतो की मज पामराला कंठसंगितात नायक व
गायक असे काही प्रकार असतात हेच ठाऊक नाही. आमच्या समजुतीप्रमाणे
कंठसंगीतामध्ये जो कंठाने गातो तो गायक आणि फक्त गायकच. आणि गायक म्हटला
की त्याच्याशी संबंधित असते ती त्याची गायकी. आता यात 'नायकी' चा संबंध
कुठे आला हे आम्हाला माहीत नाही..!

हे जे कुणी संगीतज्ञ (? ) हर्डीकर आहेत ते म्हणतात की  'श्रीयुत
मल्लिकार्जुन मन्सूर, उस्ताद अमीर खां, पंडित कुमार गंधर्व, श्रीमती
किशोरी अमोणकर आणि पंडित जितेंद्र अभिषेकी एवढी नावे घेतल्यावर बाकी सगळी
नावे सहाव्या बोटावर येतात.' आता स्पष्टच सांगायचं झालं तर यातील
नायक-गायक हा आम्हाला केवळ एक फाजील शब्दच्छल वाटतो आणि हर्डीकरांच्या
रसिकतेविषयी आणि बहुश्रुततेविषयी शंका उत्पन्न होते. एक गोष्ट आम्ही
प्रथमच नमूद करतो की वरील ५ गायकांविषयी आणि त्यांच्या कलेविषयी आम्हाला
नितांत आदर आहे. आम्ही वेळोवेळी त्यांच्या उत्तुंग गायकीचा अनुभव घेतलेला
आहे व प्रसंगी आम्ही त्यांच्या गायकीसंदर्भात विस्तृत विवेचनही करू शकतो.
परंतु मुद्दा तो नाही. मुद्दा असा की काहीतरी गायक-नायक च्या अंमळ फाजील
शब्दच्छलाआड वरील ५ गायक हेच काय ते नायक (आणि पर्यायाने गायकसुद्धा!)
आणि मग अन्य सारे गवई काय रावसाहेबांच्या भाषेत केवळ 'मिरजेचे
ब्यँडवाले'?

मग अब्दुल करीमखासाहेब, सवाईगंधर्व, भास्करबुवा, नारायणराव बालगंधर्व,
मास्तर कृष्णराव, अंतुबुवा, विलायतहुसेन खासाहेब, वझेबुवा, गजाननबुवा,
जगन्नाथबुवा ही मंडळी कोण होती? गायक होती की नायक? प्रवाही, सुरेल,
लयदार, बोलांशी मस्त खेळणारे आमचे फैयाजखासाहेब काय नायक नव्हते? जयपूर
गायकीचा अत्यंत शांत व सुंदर आविष्कार करणारे निवृत्तीबुवा कोण होते?
गायक की नायक..? श्रोत्यांना स्वरदार लयीवर अक्षरशः: खेळवत झुलवत ठेवणारे
वसंतराव किंवा लयीवर आरूढ होऊन आक्रमक गायकी मांडणारे पं रामभाऊ मराठे ही
मंडळी कोण होती? गायक की नायक? खडीसाखरेसारखा गळा असणाऱ्या आणि अगदी
सात्त्विक गाणाऱ्या बापुराव पलुस्करांना तुम्ही काय म्हणणार? आणि लास्ट
बट नॉट द लीस्ट, आपल्या तेजस्वी स्वरात साऱ्या विश्वाला उजळून टाकणारे
स्वरभास्कर पं भीमसेन जोशी कोण होते? नशीब आमचं,भीमण्णांच्या गायकीबद्दल
हर्डीकरांचे विचार समजून घेण्याची आमच्यावर अद्याप वेळ आली नाही, आणि
येऊही नये! भीमण्णांच्या बाबतीत,

अमृताचे डोही बुडविले तुम्ही
बुडताना आम्ही धन्य झालो,
मीपण संपले झालो विश्वाकार
स्वरात ॐकार भेटला गा..

असं ज्ञानपीठ पुरस्कार विजेते विंदा करंदीकर म्हणतात, तेवढाच अभिप्राय
आम्हाला आयुष्यभराकरता पुरेसा आहे. त्यावर कुणा अन्य वृषभाने आपला शेणाचा
पो न टाकलेलाच बरा!

उगाच काहीतरी 'गायक-नायक' चे शब्दमैथुन करायचे आणि हाताची बोटं मोजून
आपल्या दळिद्री आणि संकुचित रसिकतेचे प्रदर्शन करायचे याला काय अर्थ
आहे?!

आता जरा आम्ही येतो ते संगीतातल्या सो कॉल्ड नावीन्यावर!

अभिजात संगीताच्या दुनियेत 'नवीन काहीतरी करावं, नावीन्य पाहिजे' अशी एक
फॅशनेबल ओरड आम्ही तरी गेले बराच काळ ऐकत आहोत. ख्यालगायनात
मुख्यत्वेकरून असते ती त्या त्या ख्यालगायकाची अभिव्यक्ती आणि ती
करण्याची पद्धत. आता याचे अपवादात्मक व सन्माननीय उदाहरण म्हणजे पं कुमार
गंधर्व. मान्य, अगदी मान्य. कुमारांनी खऱ्या अर्थाने आपले विचार
मांडण्याकरता कुठल्याही प्रस्थापित घराण्याचा आधार न घेता आपल्या गायकीचा
स्वत:चा असा एक वेगळा ढाचाच निर्माण केला. कुमारांचा हा अपवाद मान्य..!

परंतु अन्य गायकांचं काय? अगदी भीमण्णांसकट असे कितीतरी उत्तुंग गायक
आहेत जे घराण्याच्या चौकटी मानतात आणि त्या चौकटीत राहून तितकाच उत्तुंग
आविष्कारही करतात. परंतु 'नावीन्य! नावीन्य! वैचित्र्य! वैचित्र्य! ' असे
डराव डराव करणारे बेडूक हे दर पावसाळ्यात उपजतच असतात आणि पावसाळा संपला
की आपोआप नाहीसे होतात! आमचा या बेडकांवर राग आहे.

अहो घराणेदार-वळणदार गायकी म्हणून काही चीज आहे की नाही? तुम्ही परंपरेनं
चालत आलेली घराणेदार गायकी मानणार आहात की नाही? की नावीन्याच्या आणि
वैचित्र्याच्या नावाखाली सगळा सावळा गोंधळ आणि भ्रष्टाचार माजवणार आहात?
खरंतर घराण्याची शिस्त अंगी बाणवून त्यात काही अभिव्यक्ती करण्याची तुमची
लेको कुवतच नाही. आणि मग तो दोष झाकण्यासाठी उगाच  त्यावर 'आम्ही
घराणेदार गायकी मानत नाही, आम्ही काहीतरी नवीन, वैचित्र्यपूर्ण शोधतो
आहोत' असे काहीसे शब्दमैथुनाचे इमले रचायचे झालं!

केवळ अलौकिक, अप्रतिम अशा चिजांचं भांडार असलेलं समृद्ध आग्रा घराणं आणि
त्यातले नोमतोमवाले, बोलबनाववाले आग्रा गवई, लोचदार-लयदार जयपूर गायकी
अधिक समृद्ध करणारे मन्सूरअण्णा आणि किशोरीताई (हर्डीकरांनी ही दोन नावं
जरी नावीन्यासंदर्भात घेतली असली तरी दोघेही जण घराण्यात राहूनच गातात
असे आमचे म्हणणे आहे! ), तर कुठे ग्वाल्हेरचा 'चमेली फुली चंपा.. ' चा
झुमऱ्यातला जमलेला रंगतदार हमीर, तर कुठे हिराबाई-भीमण्णांचा
हरिद्वारच्या गंगेइतका शुद्ध, सात्त्विक असा शुद्धकल्याण!

हे सारं सारं आपल्या घराणेदार गायकीनेच दिलं ना??

उगाच काय काहीतरी नावीन्याची आणि वैचित्र्याची थेरं माजवायची??

आता तुमचे ते अलीकडच्या काळातले महागडे कॉर्नफ्लेक्स की काय म्हणतात ते
दुधात बुडवून खायचे फ्लेक्स. क्षणभर मान्य करू की ते पौष्टिक असतात,
सात्त्विक असतात. अहो, पण कधीतरी तुम्ही तूप-गूळ घातलेला कुस्करलेल्या
पोळीचा 'भूकलाडू' खाल्ला आहे काय हो? कधीतरी गरम गरम पोळीवर थोडं तूप आणि
लसणीचं तिखट पेरून त्याची गुंडाळी करून खाल्ली आहे काय हो? अहो जळ्ळी
तुमची ती आधुनिक फ्रँकी का काय ती आत्ता आली, पण तिची मूळ कल्पना त्याच
आमच्या पारंपरिक गुंडाळीवर बेतलेली आहे हे तुम्हाला माहित्ये का?!

आधी नाकाला लोंबणाऱ्या शेंबडाच्या लोळ्या पुसायला शिका, किमान पहिली २५ वर्ष
तरी एखाद्या घराणेदार गायकीत मुक्तपणे वावरा, बुद्धी असेल तर
त्यातली डेप्थ शोधायचा प्रयत्न करा. खूप मोठं सात्त्विक समाधान मिळेल,
आनंद मिळेल!

नावीन्य! नावीन्य! वैचित्र्य वैचित्र्य! म्हणून नाचणं बंद करा.. ज्ञानी
व्हा, आनंदी व्हा, स्वानंदी व्हा, सुखी व्हा..!

तथास्तु.. :)

-- तात्या अभ्यंकर.

February 14, 2012

मधुबालाच्या जन्मदिनाच्या आणि प्रेमदिनाच्या सर्वांना शुभेच्छा...!

आज १४ फेब्रुवारी - 'व्हॅलेन्टाईन डे', अर्थात प्रेमदिन. त्याचप्रमाणे भारतीय रजतपटावरील निस्सिम सौंदर्याचा आणि मोहक हास्याचा मानबिंदू - मधुबाला हिचाही आज जन्मदिन. आणि म्हणूनच या निमित्ताने आम्ही आज हा प्रेमदिन - 'जागतिक सौंदर्य दिन' म्हणूनही साजरा करत आहोत. तरी आमच्या सर्व वाचकांना, हितचिंतकांना प्रेमदिनाच्या आणि जागतिक सौंदर्य दिनाच्या अनेकोत्तम शुभेच्छा..!


सोबत मधुबालाला अत्यंत प्रिय असलेले मथुरा-पेढे आपल्या सर्वांकरता येथे देत आहे.. :)


-- तात्या अभ्यंकर.

February 04, 2012

इस दर्द को लेकर जिता है, इस दर्द को लेकर मरता है.. (भाग - ३)

या पूर्वी -


...घटकेपूर्वी हसून मला डोळा मारणार्‍या दाईमाच्या डोळ्यात कधी पाणी उभं राहिलं हे तिचं तिलाही कळलं नाही..!

त्यानंतर दोनचारदा तरी दाईमाकडे गेलो असेन. दाईमादेखील माझ्यासारख्या अभ्यागतासोबत मनमोकळेपणाने बोलली, अगदी बरंच काही..

दाईमा, वेळोवेळी अनेक ठिकाणी छापून आलेल्या अनेक मान्यवरांच्या आठवणी, टाईम्सच्या हापिसातली काही जुनी विंग्रजी वृत्तपत्र, राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय इत्यादी अनेक ठिकाणांहून मधुबालेबद्दल माहिती घेतली खरी परंतु ही लेखमाला लिहिताना मात्र गडबडून गेलो आहे. तिचं हास्य, तिची बुद्धीमत्ता, तिचा वक्तशीरपणा, तिचं अभिनय सामर्थ्य, तिच्या आयुष्याची सर्वाथाने वाट लावणारा तिचा कर्दनकाळ बाप, तिची दानशूरता, तिचं प्रेमप्रकरण, तिची मानसिकता, गर्दीपासून नेहमी दूर राहण्याचा तिचा स्वभाव, तिची अत्यंत साधी राहणी, एकाच वेळी बाहेरून अगदी विलक्षण अल्लड तर आतून तर अगदी अंतर्मुख आणि कमालीची विवेकी.. किती कंगोरे असावेत या शापित यक्षिणीच्या व्यक्तिमत्वाला? या सगळ्याबद्दल इतकं भरभरून वाचायला मिळालं तरी याचं संकलन कसं करावं, सुरवात कुठून करावी आणि संपवावं कुठे याबद्दल भांबावून गेलो आहे..  तरीही बघतो प्रयत्न करून...

देव आनंदला जिथे जिथे तिच्याबद्दल काही लिहायची, बोलायची वेळ आली तेव्हा तेव्हा त्याने तिच्याबद्दल अत्यंत आदरपूर्वक गौरवोद्गारच काढलेले पाहायला मिळाले. देवच्या 'कालापानी'च्या चित्रिकरणाच्या वेळची गोष्ट. कुठल्याही चित्रपटाचं शुटींग असो, सकाळी ठीक ९ वाजता स्टुडीयोत हजर रहाणं आणि काहीही झालं तरी संध्याकाळी ठीक ६ वाजता घरी परतणं हा मधुबालेचा पायंडा बराच प्रसिद्ध होता. इतका की मधुबाला हजर झाली किंवा निघाली की त्यानुसार आसपासची लोकं अनुक्रमे ९ व ६ वाजताची स्वत:ची घड्याळे जुळवत असत! परंतु देव काही तिच्या या शिस्तीला सरावलेला नव्हता. त्यामुळे कालापानीच्या पहिल्याच दिवशी देवची गाडी जरा उशिरानेच फाटकात शिरली. पाहतो तर तिथेच मधुबाला उभी.. 

"आ गये मालिक? अभी कुछ काम भी किया जाए..?! :)

हे तिनं गंमतीनं म्हटलं. सोबत तिचं नेहमीचंच 'मारडाला -मोहक' हास्य.. 

देवने त्याच्या नेहमीच्या ष्टाईलने तिला म्हटलं, 'हमे 'मालिक' नही बुलाना. हम आपको दोस्त समझते है..' त्यावर 'वह तो आपका बढःपन है. लेकिन इस वक्त, इस जगह आप हमारे प्रोड्युसरसाब है, अन्नदाता है, मालिक है..!" - पुन्हा एकदा छानसं हास्य! :)

हृदयविकाराने तिचा अंत झाल्यावर टाईम्सला दिलेल्या मुलाखतीत देवसाब तिच्याबद्दल म्हणतात -

Her smile was veritable celebration of living. She was the beautiful fountain of laughter. She was robust, full of life and energy. One could never conceive that she was ill. She enjoyed her work. She was always laughing. Then out of the blue one day, she disappeared..!

अनेक प्रश्न, शंकाकुशंका विचारून दिग्दर्शकाकडून भूमिका पूर्णत: समजून घेण्याची तिची वृत्ती खरोखरंच कौतुकास्पद होती. त्यामुळेच 'महल' मधली अद्भूत स्त्री, 'कालापानी' तली पत्रकार, 'चलती का नाम गाडी' मधली एक अल्लड खोडकर मुलगी, 'मोगलेआझम' मधली राजपुत्र सलीमची एक यःकश्चित 'कनीज' असलेली पराजित प्रेयसी, तर कधी 'तराना'मधील अत्यंत सुरेख असलेली परंतु एक खेडवळ अशिक्षित मुलगी. किती विविध भूमिका आणि तेवढीच तिच्या अभिनयातील विविधता..!

'मोगलेआझम' हा तिच्या आयुष्यातला आणि एकंदरीतच भारतीय चित्रसृष्टीतला एक माईलस्टोन चित्रपट. हा चित्रपट म्हणजे मधुच्या आयुष्यातलं एक मोठ्ठं प्रकरणच. याबद्दल जमल्यास पुढे विस्तृत लिहिणारच आहे. जवळजवळ ८-१० वर्ष या चित्रपटाची निर्मिती सुरू होती. परंतु या संपूर्ण काळातील तिच्यातील दोन टोकाची (एक - दिलिपकुमारसोबतचं बहरीला आलेलं प्रेम आणि दोन - त्या प्रेमाचा संपूर्णपणे चक्काचूर, बी आर चोपडा ने तिच्यावर केलेली न्यायालयीन कारवाई आणि त्या कारवाईत दिलिपची तिच्या विरोधातील साक्ष - त्याबाबतही जमल्यास नंतर लिहीन,) मानसिक स्थित्यंतरं, असे एकूणच या काळातील तिच्या आयुष्यातले अनेकानेक चढउतार.. परंतु या सगळ्याचा तिच्या अभिनय क्षमतेवर कुठेही परिणाम नाही.. अर्थात, तिचं जगप्रसिद्ध हास्य किंचित लोप पावू लागलं होतं असं तिच्या जवळचे सांगायचे. 

'मोगलेआझम' गाणी हा त्या चित्रपटाचा प्राण. आणि त्या गाण्यातली मधुबालाची अदाकारी केवळ 'लाजवाब', 'क्या केहेने' अशी..! 'मोहे पनघट पे' मधली घायाळ करणारी अनारकली, 'प्यार किया तो डरना क्या' मधली बिनधास्त अनरकली, किंवा दीदीच्या केवळ अद्भूत स्वरांच्या साथीत 'मोहोब्बत की झुठी कहानी पे रोए' या गाण्यातली, गळ्यात-अंगाखंद्यावर जाडजूड साखळदंड असलेली एक थकलेली, हारलेली अनारकली..!

कधी वाटतं, ती इतिहासातली अनारकली आणि मधुबाला या दोघी एकच तर नव्हेत? सारख्याच दुर्दैवी?!

बोलीभाषा अन् त्याच्या बारकाव्यांबद्दलचा तिचा अभ्यास असे आणि त्याकरता ती विशेष प्रयत्न करत असे. 'मोगलेआझम' ची निर्मिती सुरू असतांनाच एकीकडे ती 'हावडा ब्रिज'चंही चित्रिकरण करत होती. पण आपल्या लक्षात येईल की 'मोगलेआझम' मधलं उर्दू-फारसीचं वर्चस्व असणारं तिचं एका 'कनीज'चं अदबशीर हिंदी, तर 'हावडा ब्रिज' मधलं तिचं 'ए तुम क्या बोलता है, हमको समझमे नही आता..' असं अँग्लोइंडियन ढंगाचं हिंदी..! 'मोहोब्बत की झुठी कहानी पे रोए' तली हारलेली ती, तर 'आईये मेहेरबा..' मधली समोरच्याचं अगदी सहजच काळीज घायाळ करणारी तिची अदाकारी..!

खूप मेहनत घ्यायची हो ती. खूप लगन होती तिची..!



१९६४ मध्ये तिचा 'शराबी' हा चित्रपट प्रसिद्ध झाला तेव्हा त्या चित्रपटाची जाहिरात अशी होती -

The poet saw
Beauty

The sculptor carved her
Image

They named her
Venus

We call her
Madhubala…!

(क्रमश:...) 

-- तात्या अभ्यंकर.

January 06, 2012

इस दर्द को लेकर जिता है, इस दर्द को लेकर मरता है.. (भाग - २)

हिंदुस्थानी घराणेदार रागसंगीत, नारायणराव बालगंधर्व, अब्दुल करीमखासाहेब, भीमसेनअण्णा, बापुराव पलुस्कर, भाईकाका, बाबूजी, दीदी, पंचमदा, किशोरदा, मधुबाला, वहिदाआपा.. इ इ अनेक, हे सारे आमचे जबरदस्त दुखरे बिंदू. त्यांचा अभ्यास आणि त्यांच्यावरची भक्ति ही कधीही न संपणारी आहे!
--------------------------------------------------------------------------------------------------------------------
या पूर्वी -
इस दर्द को लेकर जिता है, इस दर्द को लेकर मरता है.. (भाग - १)
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------

वसंता पोतदार तसा वेडझवाच होता, परंतु दोस्त होता आपला. भीमण्णा हा आमच्या दोस्तीतला दुवा. एकेदिवशी केव्हातरी वसंताचा फोन आला,

"तात्या, मधुबालेवर प्रेम करतोस ना..?"

"हो..काही कोटींपैकी मीही एक.." मी उत्तरलो.

"एक पत्ता लिहून घे..."

संशोधन करणं हे वसंताचं व्यसन होतं. त्यामुळे वसंता जे काही सांगेल ते ऑथेन्टिकच असेल म्हणून मी पत्ता लिहू लागलो. वसंताने 'दाईमा' नावाच्या कुणा स्त्रिचा पत्ता मला दिला. ही दाईमा मधुबालेच्या शेवटच्या काळातील तिची नोकर होती. तिचा पत्ता म्हणजे डोंगरी अग्निशमन दलाजवळची कुठलीशी एक चाळ होती. वसंताने दिलेल्या पत्त्यावर मी पोहोचलो. मधुबालेची आवडती गुलाबाची काही फुलं आणि तिला अत्यंत प्रिय असलेला कलाकंद सोबत घेतला होता. चाळ शोधून काढली. दारावर टकटक केली. साधारण ८० च्या आसपास असलेल्या एका वृद्ध स्त्रिने दरवाजा उघडला. तीच दाईमा होती.

"नमस्ते. मंझली आपा के बारे मे कुछ जानना है.." (मधुबालेला बरेचजण 'मंझली आपा' या नावाने ओळखत.)

दाईमाच्या चेहेर्‍यावर स्मितहास्य उमटलं ( मधुबालेच्या संगतीत राहिल्यामुळे तेही गोडच होतं! :) ) आणि तिनं मला घरात घेतलं. पाणी विचारलं. मी गुलाबाची फुलं आणि कलाकंद तिला दिला. दाईमाचं अस्पष्ट बोलणं आणि तिचं हिंदी, हे मला प्रयत्नपूर्वक समजून घ्यायला लागत होतं. प्रास्ताविक झालं आणि कुठलेच आढेवेढे न घेता म्हातारी भूतकाळात हरवली. वय बरंच असल्यामुळे तिच्या बोलण्यात सुसंगतेचा थोडा अभावच होता. ती माझ्याशी हिंदीतच बोलत होती, पण इथे मी ते मराठीत लिहिणार आहे..

"ती खूप म्हणजे खूपच खोडकर होती.."  दाईमा आता सांगू लागली..

काही वेळेला आपल्या मधाळ सौंदर्याचा उपयोग ती काही लोकांची गंमत करण्यासाठी करत असावी. पटकन कुणाच्याही प्रेमात पडावं इतकी काही ती नासमझ नव्हती. तिनं मनापासून प्रेम केलं ते फक्त युसुफमियावर.. किशोरबाबावर पण तिचा जीव होता, नाही असं नाही! पण एकंदरीत अवखळ वृत्ती, खळाळून हसणं हा तिचा स्थायीभाव होता. पटकन हास्याच्या कारंज्यात शिरायला तिला काही विशेष कारण लागत असे असं नाही.. पुष्कळदा शक्ति सामंता, देवसाब सारखे लोक तिचं हसू थांबायची वाट पाहात असत. "झालं का गं बये तुझं पोटभर हसून? म्हणजे आम्हालाही काही तुझ्याशी बोलता येईल." असं ते म्हणायचे.. :)

आपल्या आवडत्या व्यक्तिला गुलाबाचं फूल द्यायची तिची एक सवय होती.

"पण त्या फुलासोबत 'तू मला खूप आवडतोस. माझ्याशी लग्न करणार असलास तर हे फूल स्विकार कर.. - अशी एक चिठ्ठीही द्यायची ना..?"  -- मी दाईमाला विचारलं.

त्यावर दाईमा स्वत:च खळखळून हसली.

"हम्म.. पण तशी चिठ्ठी प्रत्येक वेळेलाच द्यायची असं नाही. एक बार ऐसा मजाक उसने प्रेमनाथ के साथ किया था..! बेचारा प्रेमनाथ. बुद्दू कहिका..!" :) -- इति दाईमा.

"बेटा, चाय पियोगे..? रुको, 'मंझली आपा' को प्यारी तुलसीपत्तेवाली चाय बनाके लाती हू.."

दाईमा आता स्वत:च मुडात येऊ लागली होती..

पहिल्या दिवसापासूनच प्रेमनाथने मधुबालेवरती गोंडा घोळायला सुरवात केली होती. म्हणून मग गंमत म्हणून मधुबालेनं गुलाबाचं फूल आणि चिठ्ठी त्याला दिली.. प्रेमानाथ बिचारा उभ्याउभ्याच जमिनीवर कोसळून पडायचा बाकी होता.. सार्‍या दुनियेतली सर्वात सुंदर स्त्री आपल्याला फूल देते आहे..! ओहोहो..! :)

पुढे मग काही दिवस प्रेमानाथचं आणि मधुबालेचं प्रेमप्रकरण हा चित्रसृष्टीतला एक चर्चेचा विषय ठरला. पण तुला अंदरकी बात सांगते - प्रेमनाथच्या गोंडा घोळण्याच्या स्वभावामुळे मधुबालेनेच त्याची मस्करी केली होती. तिला भोगू पाहणारे खूप म्हणजे खूप होते रे तेव्हा आजूबाजूला. पण मंझलीआपा त्या सर्वांची वस्ताद होती. त्या सगळ्यांची ती मस्तपैकी फिरकी घ्यायची. मनमुराद हसत आणि एन्जॉय करत! :)

काही दिवसांनी काय झालं कोण जाणे, प्रेमनाथ दुरावला तिला.. एकदा केव्हातरी प्रेमनाथने म्हणे त्या गुलाबाची अन् चिठ्ठीची हकिकत मोठ्या विश्वासाने अशोककुमारला सांगितली. त्यावर अशोलकुमार त्याला चमकून म्हणला,

"काय सांगतोस..? अरे पण अशी चिठ्ठी आणि गुलाबाचं फूल तिनं मलाही दिलं आहे..!"

एवढं सांगून दाईमा तोंडातलं बोळकं दाखवत मोकळी हसली आणि तिनं माझ्याकडे पाहून आपला म्हातारा मिचमिचा डोळा मारला.. ;)

"पण खर सांगू का तुला, खर्‍या प्रेमाकरता ती नेहमी भुकेली राहिली आणि भुकेलीच मेली रे.."



घटकेपूर्वी हसून मला डोळा मारणार्‍या दाईमाच्या डोळ्यात कधी पाणी उभं राहिलं हे तिचं तिलाही कळलं नाही..!

(क्रमश: ..)

-- तात्या अभ्यंकर.

January 05, 2012

इस दर्द को लेकर जिता है, इस दर्द को लेकर मरता है.. (भाग - १)

लेखाधार - अनेकांकडून तिच्याबद्दल लिहिले गेलेले आठवणीवजा लेख.

अलिकडेच केव्हातरी ठाण्याजवळच्या घोडबंदर रस्त्यावरून चाललो होतो. आता या घोडबंदर परिसराचा संपूर्ण कायापालट झाला आहे. लांबलचक रुंद रस्ता आणि आजुबाजूला मोठमोठे घरप्रकल्प आणि सर्वत्र सिमेन्टचं जंगल. परंतु एकेकाळी मात्र इथे अगदी भरपूर वनश्री होती, झाडंझुडपं होती. सर्व परिसरच अत्यंत रमणीय होता.

गुरुदत्तच्या मिस्टर अँड मिसेस ५५ चित्रपटाचं काम सुरू होतं आणि गुरुदत्तने चित्रपटाचा काही भाग चित्रित करण्यासाठी याच रमणीय परिसराची निवड केली होती. चित्रपटाचे संवादलेखक अब्रार अल्वीही सोबत होते. वास्तविक चित्रिकरणाच्यावेळी त्यांचं काहीच काम नव्हतं परंतु केवळ गुरुदत्तच्या आग्रहाखातर ते ऐन उन्हाळा असूनही सोबत आले होते. चित्रिकरणस्थळी पोहोचल्यावर त्यांनी एक छानसी हवेशीर सावली पाहून एका झाडाखाली निवांत बैठक मारली. एकिकडे चित्रिकरणाची लगबग सुरू होती तेवढ्यात 'ती' अल्वींच्या शेजारी आली आणि 'अरे वा! यहा बैठे हो आरामसे, आपके तो मजे है..' असं म्हणत तिनेही त्यांच्या शेजारीच मस्त बैठक मारली. मनमोकळं, निरागस, अल्लड, जीव खलास करणारं हास्य, मोहक अदा....! मूर्तीमंत सौंदर्यच अल्वींच्या शेजारी काही क्षण विसावलं होतं!



काही दिवसांपूर्वी अल्वींची ही आठवण वाचनात आली होती.

मालाडला बाँबे टॉकिजच्या लगतची झोपडपट्टी. तिथे अताउल्लाखान नावाचा एक पठाण राहायला आला होता. सोबत त्याच्या बायकोचा व ८-९ पोरांचा कुटुंबकबिला. त्यापैकीच एक बेबी मुमताज. बेबी मुमताज दिसायला सुरेख, वागण्याबोलण्यात चांगलीच चंट आणि हुशार. गायचीही आवड. बेकार असलेल्या अताउल्लाखानने लेकीचं नशीब आजमावण्याकरता आणि त्यायोगे उत्पन्नाची काही सोय होते का ते पाहायला बेबी मुमताजला शेजारीच असलेल्या बाँबे टॉकिजात नेलं. तिथं त्यांची गाठ पडली बाँबे टॉकिजचे अध्वर्यू हिमांशू राय आणि देविकाराणी यांच्याशी. त्यांनी पाहताचक्षणी बेबी मुमताजला पसंद केलं आणि लगोलग तिचं 'बसंत' ह्या चित्रपटातून भारतीय रजतपटावर पहिलावहिलं आगमन झालं. ८-१० वर्षाच्या एका मोहक चिमुरडीनं रंगमंचावरून 'मेरे छोटेसे मन मै छोटीसी दुनिया रे...' हे गाणं गायलं आणि गाण्यानंतर 'आप लोग कल आईये तो और सुनाउंगी गाना..' असं म्हणत चटकन एक छानशी अर्धगिरकी घेऊन मागे वळली. ती तिची पहिली मोहक अदा..!

ते वर्ष होतं १९४२. तेव्हापासून प्रवास सुरू झाला एका निस्सीम मनमोहक सौंदर्याचा. प्रवास सुरू झाला एका जीवघेण्या मोहक हास्याचा, प्रवास सुरू झाला मधाळतेचा अन् मादकतेचा.. 'प्रेम' या संकल्पनेवरच जिनं जिवापाड प्रेम केलं अशा एका शापित यक्षिणीचा प्रवास सुरू झाला. देविकाराणीने त्या बेबी मुमताज, अर्थात मुताज जहान बेगम दहलवीचं 'मधुबाला' असं नामकरण केलं आणि....

Venus of Indian Cinema चा उदय झाला..!

अत्यंत प्रतिभाशाली अन् नैसर्गिक अभिनय क्षमता, लहान वयापासूनच असलेला विलक्षण आत्मविश्वास, जगाला वेड लावणारं हास्य - कधी स्मितं तर कधी अल्लड खळखळणारं, आणि सार्‍या विश्वात एकमेवाद्वितीय ठरावं असं सौंदर्य.. या सगळ्याचं बेमालूम मिश्रण म्हणजे ती..! १४ फेब्रुवारी हा तिचा जन्मदिन. सारी दुनिया तो दिवस 'प्रेमदिन' म्हणून साजरा करते.. माझ्या मते १४ फेब्रुवारी हा जसा प्रेमदिन आहे तसाच तो 'The Devine Beauty Day..' म्हणूनही तिच्या नावे सार्‍या जगभरात, निदान भारतात तरी साजरा व्हावा..!

एव्हाना मालाडच्या झोपडीतून तिचं कुटुंब पेडररोडवरच्या अपमार्केट मध्ये राहायला आलं होतं. एकाच वेळेला अनेकानेक चित्रपटांचं चित्रिकरण सुरू झालं होतं आणि सुरेन्द्र, सप्रू, सुरेश इत्यादींपासून ते अशोककुमार, देवसाब, आरके यासारख्या नामवंतांसोबत ती अगदी लीलया सराईतपणे आपला ठसा उमटवीत होती. परंतु लहान वयापासूनच चित्रपटात काम सुरू केल्यामुळे फॉर्मल शिक्षण म्हणून जे असतं ते तिच्याजवळ नव्हतं. त्यामुळे डॉ सुशिलाराणी पटेल यांच्याकडे संभाषणात्मक इंग्रजीचे धडे गिरवायला तिने सुरवात केली..

बाबुराव पटेल हे 'फिल्म इंडिया' या पहिल्या सिमेमासिकाचे संपादक तसंच सिनेदिगदर्शक. त्यांच्या पत्नी डॉ सुशिलाराणी पटेल याही लेखक, अभिनेत्री तसंच पत्रकारही. या पटेल दाम्पत्याचा तिच्यावर विलक्षण लोभ.. सुशिलाराणींनी आठवण सांगितली होती - 'त्या काळात रोज संध्याकाळी चित्रिकरण संपलं की तेवढ्याच उत्साहाने ती आमच्या घरी यायची. जेवढी सुरेख-मोहक, तेवढीच अल्लड आणि निष्पाप मनमोकळ्या स्वभावाची होती ती. घरच्या गरिबीपायी फॉर्मल शिक्षण नव्हतं परंतु बुद्धीमत्ता होतीच. त्यामुळेच ती माझ्याकडे अवघ्या ३ महिन्यात अगदी उत्तम इंग्रजी बोलायला शिकली. बर्‍याचदा तिचं आमच्याकडे खाणं-पिणंही व्हायचं.. त्यातून ' गरमागरम पकोडे' हे तिचे विशेष लाडके! Smile

ती जेव्हा अगदी प्रथम त्यांच्या घरी आली तेव्हा सुशिलाराणींनी लिहून ठेवलं आहे -

"She was wearing no make up. Her dazzling smile and lovely olive complexion required no artificial help. She was well built and complete natural..!"

असो..

तूर्तास थोडा हळवा झालो आहे म्हणून इथेच थांबतो. साक्षात कर्दनकाळ असलेल्या बापालाही 'नो रिग्रेटस्' असं म्हणून माफ करणारा तिचा स्वभाव, तिची दानशूरता, तिचं आणि दिलिपकुमारचं प्रेमप्रकरण, तिचं आणि किशोरदाचं बस्तान न बसलेलं लग्न, सार्‍या दुनियेची हृदयं काबीज करणारी ती, परंतु तिचा स्वत:चा मात्र जीवघेणा हृदयरोग आणि त्यानंतरचं भयानक एकाकीपण व त्यातच तिचं अकाली जाणं...! अजून खूप काही लिहिन म्हणतो. जमेल की नाही ते सांगता येणार नाही..!

'मेरे छोटेसे मन मै छोटीसी दुनिया रे...' या गाण्याचा उल्लेख वर केला आहे. याच गाण्याच्या काही ओळी आहेत,

'छोटी सी दुनिया की छोटी छोटी बाते,
छोटे छोटे दिन और छोटी छोटी राते..
छोटी उमरिया रे.."

कसा योगायोग असतो पाहा.. 'छोटी उमरिया रे..' असं म्हणून ते कडवं संपतं. पण तीच ओळ तिच्याबाबतीतही 'छोटी उमरिया रे..' म्हणून खरी ठरते आणि मुमताज जहान बेगम दहलवी अवघ्या ३६ व्या वर्षीच या जगाचा निरोप घेते..!



(पुढील भाग सवडीने)

-- तात्या अभ्यंकर.

January 02, 2012

आप के हसीन रुख..

आप के हसीन रुख.. (येथे ऐका)



यमन रागाच्या पार्श्वभूमीवरचं नय्यरसाहेबांचं रफिसाहेबांनी गायलेलं एक शांत, तरल, सुरेख गाणं..

गिटारने दिलेली लय आणि पियानोचे सुंदर तुकडे. मोजका वाद्यमेळ. तरीही नय्यरसाहेबांची अत्यंत अनोखी आणि प्रतिभाशाली धून आणि रफिसाहेबांचा रसाळ, सुरीला आवाज या अवघ्या दोन भक्कम बाजुंमुळे गाण्याचं सोनं झालं आहे. किंचित ठाय असलेली 'एक-दो,एक-दो' ही खास नय्यर ठेवणीतली लय आणि त्या लयीचा अक्षरश: गालावरून मोरपीस फिरावं इतकाच आटोपशीर, संयत आघात. काय बोलावं नय्यरसाहेबांच्या चिरतरूण प्रतिभेबद्दल..?!

'खुली लटोकी छाव में खिला खिला ये रूप है..'

'रूप है..' शब्दावरचा शुद्ध गंधार कायच्या काय सुरीला. तानपुर्‍यातल्या गंधाराची आठवण करून देणारा..!

'घटा से जैसे छन रही सुबह सुबह की धूप है..'

या ओळीतून उलगडत जाणार्‍या यमनबद्दल काय बोलावं महाराजा..? ही अत्यंत स्वाभाविक आणि नैसर्गिक अशी यमनची स्वरसंगती. परंतु तेवढीच ताजी व नवी वाटणारी!
'घटा', 'से', 'जैसे', 'छन', 'रही' हे शब्द फक्त कसे पडले आहेत ते पाहा म्हणजे नय्यरसाहेबांनी 'लय' ही गोष्ट किती पचवली होती हे लक्षात येईल. पुढे 'जिधर नजर मुडी..' तली तोड आणि त्यानंतरचा पॉज..! नय्यरसाहेबांच्या प्रतिभेला मी शब्दात कसं बांधू..?!

गाण्याच्या चित्रीकरणातली माला सिन्हा आम्हाला विशेष पसंत नाही, परंतु तनुजावर आम्ही प्रेम करतो.. ऐन जवानीत काय दिसायची तनुजा! व्वा.. वा..!

आणि अगदी कोवळ्या तरूण वयातला धर्मा मांडवकर काय सुरेख दिसतो.. अगदी हँडसम...! 'त्याला फारसा अभिनय येत नाही', 'नाचता येत नाही..' असे त्याच्यावर आरोप केले जातात. परंतु आम्हाला मात्र या गाण्यातला लाजराबुजरा आणि शोलेत टाकीवर चढून बसंती आणि मौसीला पटवणारा बिनधास्त बेधडक धर्मा मांडवकर अत्यंत प्रिय आहे! Smile

एकंदरीत गाणं ऐकून तृप्ती होते, जीव शांत होतो.

हल्ली मात्र आमची रसिकताच लाचार झाली आहे त्यामुळे आम्ही 'मुन्नी बदनाम', 'शीला की जवानी.' यासारख्या अत्यंत फालतू आणि 'कोलावरी..' सारख्या अत्यंत सामान्य गाण्यावरच समाधान मानतो..!

चालायचंच.. कालाय तस्मै नम:

रफीसाहेबांना आणि नय्यरसाहेबांना मात्र मानाचा मुजरा..!

-- तात्या अभ्यंकर.