October 31, 2010

रैना बिती जाए..


राग तोडी..! हिंदुस्थानी रागसंगीतातला एक दिग्गज राग. ज्याला तोड नाही असा तोडी..!

सुरवातीलाच सारंगी. भाईकाकांच्या भैय्या नागपुरकराच्या भाषेत सांगायचं तर 'कलिजा खल्लास करणारी जीवघेणी सारंगी..!' 'नी़ नी़सा सा..' ने संपणारा दीदीचा केवळ अशक्य आलाप - तकदीरचा मारा असलेल्या कुणा आनंदबाबूला घायाळ करतो अन् त्याचे पाय थबकतात..! सुरांचा तो प्यासा त्या तोडीच्या झर्‍याच्या शोधात माडी चढतो..!
 
'रैना बिती जाए..!' - पंचमदांची अद्भूत प्रतिभा अन् दीदीचा स्वर.. हिंदुस्थानी सिनेसंगीतातलं एक माईलस्टोन गाणं जन्म घेत असतं..! 

संतूर, गिटार, आणि केहेरव्याचा वजनी ठेका.. सारंच भन्नाट..!

'निंदीया ना आए..' - तोडीच्या स्वरात संपूर्णत: वर्ज्य असणारे, विसंगत वाटणारे शुद्ध मध्यम, शुद्ध धैवत फक्त पंचमच टाकू शकतो. अन्य कुणाची ना तेवढी हिंमत, ना तेवढी प्रतिभा. खूप खूप मोठा माणूस..!

दुर्दैवाने घरात सुख न लाभलेला आमिरजादा आनंदबाबू आणि सुरांची मलिका असलेली त्याची पुष्पा..! 'आय हेट टियर्स, पुष्पा..!' असं म्हणणारा आनंदबाबू. शारिरीक वासनेचा नव्हे तर पुष्पाच्या स्वरांचा भुकेला, तिला प्रेमाने हलवा-पुरीची फर्माईश करणारा आनंदबाबू..! कोठेवालीचा व्यवसाय करणारी पुष्पा - जिच्या घरात नेहमी पूजा-फुलांनी मढलेला देव्हारा अन् सोबतीला रामकृष्ण परमहंसांची तसबीर..!

शब्दांचं प्रेम, स्वरांचं प्रेम, अमरप्रेम..! काय चूक, काय बरोबर हे ज्यानं-त्यानं ठरवू देत.. आमचा मात्र सलाम त्या दीदीला, त्या पंचमला, त्या आनंदबाबूला अन् शर्मिला टागोर नामक त्या पुष्पा कोठेवालीला..!

-- तात्या अभ्यंकर.

1 comment:

santosh ekande said...

शॉ...ल्...ली...ड दादा