March 13, 2008

शिंत्रेगुरुजी... १

राम राम मंडळी,
पटवर्धनांचं घर. एक नावाजलेलं घर. बडी मंडळी, पैसेवाली. गाडी, बंगला सगळ्याची अगदी रेलचेल. स्वत: दादापटवर्धन, दोन मुलं, सुना सगळी कर्तबगार मंडळी. स्वकष्टाने वरती आलेली. हे सगळं कुटुंबच्या कुटुंब माझं अशीलआहे. त्यांचे समभाग बाजारातील सर्व आर्थिक व्यवहार मी पाहतो. त्यामुळे कधी त्यांच्या हापिसात, तर कधीत्यांच्या घरी माझं येणंजाणं सुरूच असतं. त्या दिवशीही मी असाच काही कामानिमित्त त्यांच्या घरी गेलो होतो.

तो सर्वपित्रि-अमावास्येचा दिवस होता. भाद्रपदातील अमावास्या. या दिवशी पितरमंडळी आपापल्या घरी जेवायलायेतात म्हणे. भाताची खीर, भाजणीचे वडे, गवार-भोपळ्याची भाजी, आमसुलाची चटणी असा जोरदार बेत असतोबऱ्याचशा घरांत. बरीच मंडळी या दिवशी श्राद्धपक्ष वगैरे करतात. ब्राह्मणभोजन घातलं जातं, दक्षिणा दिली जाते. माझ्यासारखे, जे काहीच करत नाहीत ते या दिवशी दुपारी बाराच्या सुमाराला कावळ्याला पान ठेवतात. पितरमंडळी कावळ्याच्या रुपात येऊन या बेतावर ताव मारतात आणि आपापल्या वंशजांना भरल्यापोटानेआशीर्वाद देऊन परत जातात! ;) असं म्हणे हो!

मी पटवर्धनांच्या घराची बेल वाजवली. स्वत: दादा पटवर्धनांनी दार उघडलं. दादा पटवर्धन. एक जंक्शन माणूस! 'अरे या तात्या. काय म्हणतांय तुमचं शेअरमार्केट? आमच्या नाड्या काय बाबा, तुमच्या हातात' असं नेहमीचंबोलणं दादांनी मिश्कीलपणे सुरू केलं. दादा सोवळ्यातच होते. उघडेबंब, गोरेपाऽन आणि देखणे. कपाळाला खास यादिवशी लावलं जाणारं गोपिचंद गंध लावलेलं! दिवाणखान्याच्या एका कोपऱ्यात श्राद्धविधीचा कार्यक्रम नुकताचआटपलेला दिसत होता. पिंडदानही झालं होतं. शिंत्रेगुरुजी श्राद्धाचं जेवायला बसले होते.

शिंत्रेगुरुजी!

एक हडकुळी व्यक्ती. पन्नाशीच्या पुढची. उभट चेहरा, अर्धवट पिकलेले केस. काही दात पडलेले, आणि जे होते तेपुढे आलेले. वर्ण मळकट काळा. मळकट धोतर नेसलेले, त्याहूनही मळकट जानवं. असा सगळा शिंत्रेगुरुजींचाअवतार.
या गुरुजी मंडळींचे दोन प्रकार असतात. एक म्हणजे सत्यनारायण, लग्न-मुंज, इत्यादी शुभकार्ये करणारे, आणियांची दुसरी जमात म्हणजे मर्तिकं, श्राद्धपक्ष हे विधी करणारी. शिंत्रेगुरुजी दुसऱ्या जमातीतले. शिंत्रेगुरुजींशीमाझीही अनेक वर्षांपासून ओळख आहे. शिंत्रेगुरुजी आमच्याही घरी कधी श्राद्धपक्षाच्या निमित्ताने आले आहेत.

पटवर्धनांच्या घरी शिंत्रेगुरुजी मन लावून जेवत होते. त्यांची जेवायची पद्धतदेखील गलिच्छच. काही मंडळींना आधीजीभ पुढे काढून त्यावर घास ठेवायचा आणि मग जीभ आत घ्यायची, अशी सवय असते. शिंत्रेगुरुजीही त्यातलेच. हावऱ्या हावऱ्या जेवत होते. दुष्काळातून आल्यासारखे! मी पटवर्धनांच्या घरी पोहोचलो तेव्हा माझ्याकडे पाहून तेओळखीदाखल लाचार हसले होते. 'काय तात्या, कसं काय?' अशी माझी चौकशीही केली होती.

"वहिनी, थोडी खीर आणा बरं काऽऽ" असं त्यांनी म्हटलं आणि पटवर्धन वहिनींनी खीर वाढायला आणली.

"नाहीतर असं करा, थोडीशी डब्यातच द्या. घरी घेऊन जाईन!"

पटवर्धन वहिनींनी खिरीचा डबा भरला आणि शिंत्रेगुरुजींना दिला. पटवर्धन पती-पत्नींना काय हो, त्यांनाशिंत्रेगुरुजींना खीर बांधून देण्यात समाधानच होतं. आपल्या घरी आलेला ब्राह्मण जेवुनखाऊन तृप्त होऊन गेल्याशीकारण. त्या दिवसापुरता का होईना, त्यांच्या पितरांचाच प्रतिनिधी तो!

मला मात्र शिंत्रेगुरुजींचा रागही आला होता आणि दयाही आली होती!

एकीकडे माझं दादा पटवर्धनांशी कामासंबंधी बोलणं सुरू होतं. नेहमीचंच बोलणं. कुठले शेअर घेतले, कुठले विकलेयाबद्दलचा हिशेब मी त्यांना देत होतो. एकीकडे शिंत्रेगुरुजींचं जेवणही आटपत आलं होतं.दादांकडचं काम संपवूनमी निघालो. त्यांच्या घराबाहेर पडलो. समोरच पानवाला होता. म्हटलं जरा पान खावं म्हणून पानवाल्याच्यादुकानापाशी गेलो. तेवढ्यात शिंत्रेगुरुजीही विड्या घ्यायला तिथे आले. पटवर्धनांकडे एवढे टम्म जेवलेले असूनही तेहडकुळे आणि उपाशीच दिसत होते!

"काय गुरुजी, कुठली विडी घेणार?" मी.

"आपली नेहमीचीच. मोहिनी विडी!"

मी पानाचे आणि विड्यांचे पैसे दिले आणि तिथेच दोन मिनिटं पान चघळत घुटमळत उभा राहिलो. शिंत्रेगुरुजीहीआता सुखाने विडीचे झुरके घेऊ लागले. जरा वेळाने आम्ही दोघेही आपापल्या मार्गाने चालते झालो. मीदिवसभरातल्या इतर कामांच्या मागे लागलो, पण शिंत्रेगुरुजींचा विचार डोक्यातून जाईना! मी त्यांना गेली अनेकवर्ष हे असच पहात आलोय.

अहो अलीकडे मरणही महाग झालंय म्हणतात. कुणी मेला की नातेवाईकांना दिवसवारे करायचा खर्चही आताशाखूप येतो. पहिल्या दिवसाच्या मंत्राग्नी पासून ते तेराव्यापर्यंत दहा-बारा हजाराच्या घरात कंत्राट जातं म्हणतात. मर्तिकाची, श्राद्धापक्षाची कामे करणारी भिक्षुक मंडळी हल्ली 'शेठजी' झालेली मी पाहिली आहेत. मग आमचेशिंत्रेगुरुजीच असे मागे का? छ्या! शिंत्रे गुरुजींना धंदा जमलाच नाही. नाहीतर आमच्याच गावातले नामजोशीगुरुजी बघा! हातात तीन तीन अंगठ्या, गळ्यात चांगला जाडसर गोफ. पृथ्वीला लाजवील अशी ढेरी!

नामजोशी गुरुजींच्या घरी मर्तिकाचा निरोप घेऊन कुणी गेलं की,

'तेराव्या दिवसापर्यंतचं काम देता का बोला? तरच आत्ता स्मशानात येतो. आणि हो, इतके इतके पैसे होतील हो. नाही, आधीच सांगितलेलं बरं! अहो फुकटच्या अंघोळी कोण करणार?!'

असं यजमानांनाच दरडावणारे नामजोशी गुरुजी! मग शिंत्रेगुरुजीच धंद्यात असे मागे का? इतके हडकुळे का?

काहीच कळत नव्हतं!

क्रमश:

--तात्या अभ्यंकर.

No comments: