August 28, 2006

कधी रे येशील तू..

नमस्कार मंडळी,

'सुवासिनी' चित्रपटातील '
जीवलगा कधी रे येशील तू' http://www.musicindiaonline.com/p/x/3UXv-6v4zd.As1NMvHdW/?done_detect हे बाबुजींनी बांधलेलं आणि आशाताईंनी गायलेलं गाणं आपल्यापैकी बऱ्याच जणांच्या चांगलंच परिचयाचं आहे. मंडळी, हे माझं अत्यंत आवडतं गाणं आहे. याची कारणं म्हणजे अर्थातच या गाण्याची चाल, गदिमांचे शब्द, आणि आशाताईंसारखी समर्थ गायिका. एखादं गाणं कुणाला कसं भावेल हे काही सांगता येत नाही. मला हे गाणं आवडण्याचं प्रमूख कारण म्हणजे या गाण्याची पूर्णतः रागदारी संगीतावर आधारीत असलेली चाल! हे गाणं ऐकतांना बाबुजींच्या प्रतिभेची अक्षरशः कमाल वाटते. कारण केवळ एकाच रागात हे गाणं नसून एकूण अनेक रागांचा बाबुजींनी फार सुंदर रितीने वापर केला आहे. रागदारी संगीताने नटलेलं एक श्रीमंत गाणं, असंच या गाण्याचं वर्णन करावं लागेल. कितीही वेळा हे गाणं ऐकलं तरी याचा कंटाळा येत नाही, उलट प्रत्येकवेळी हे गाणं तेवढंच ताजं आणि टवटवीत वाटतं आणि मनाला आनंद देऊन जातं.

जाता जाता थोडीशी या गाण्यामागची चित्रपटातील situation समजून घेऊ. हे अशाकरता, की ज्या नायिकेच्या तोंडी हे गाणं आहे तिची मानसिक अवस्था कशी आहे हे समजून घेतलं तर गाणं ऐकतांना अधिक आनंद होईल. हे एक चित्रपटगीत असल्यामुळे या गोष्टीचा विचार करणे आवश्यक आहे. या चित्रपटाचा नायक हा सैन्यात लढाईला गेलेला असतो आणि युध्द सुरू असतांना बेपत्ता होतो. त्याचा काहीच थांगपत्ता लागत नाही त्यामुळे त्याच्या घरातली सर्व मंडळी तो मरण पावला असं समजतात. फक्त त्याची बायको तो मरण पावला आहे हे मुळीच मान्य करायला तयार नसते. तिचा नवरा एके दिवशी नक्की परत येईल असा दृढविश्वास तिला असतो. ती त्याची खूप आतुरतेने वाट पहात असते आणि याच प्रसंगावर आधारीत हे गाणं आहे.

दिवसामागून दिवस चालले,
ऋतू मागुनी ऋतू,
जीवलगा, कधी रे येशील तू!

वरती या गाण्याचा दुवा दिलेला आहेच, त्यामुळे हे गाणं आपण ऐकू शकाल, पाहू शकाल. माझे मित्र शशांक जोशी यांच्याशी एकदा याहू निरोपकावर बोलत असतांना मी त्यांना या गाण्यावर लिहायचा विचार आहे असं सांगीतलं आणि त्यांनी अत्यंत उत्साहानी मला या गाण्याचा, आणि शब्दांचा दुवा तातडीने दिला! शिवाय तू लिही, आम्हाला वाचायला नक्की आवडेल अशी दादही दिली. अशी गुणी, दाद देणारी, आणि मदत करणारी माणसं भेटली की माझ्यासारख्यांचं फावतंच! :)

असो, आपल्यापैकी अनेकांनी हे गाणं यापूर्वीही अनेकदा ऐकलं असेल, तरी पण पुन्हा एकदा आपण हे गाणं ऐकावं अशी माझी आपल्या सर्वांना नम्र विनंती आहे. म्हणजे यातल्या रागदारी सौंदर्याबद्दल वाचतांना आपल्याला अधिक आनंद होईल असा विश्वास वाटतो. हिंदुस्थानी रागदारी संगीताच्या प्रसाराकरता आणि प्रचाराकरता हा सगळा खटाटोप.

असो, मंडळी, या गाण्यात मला जे सौंदर्य दिसलं ते मी इथे सांगायचा प्रयत्न करणार आहे. आपल्यापैकी प्रत्येकाला तसं वाटेलच असं नाही. मी फक्त यातलं रागदारी सौंदर्य समजून सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. ही शिकवणी नक्कीच नाही. पण हे गाणं ऐकतांना यातले रागदारी संगीताचे बारकावे मनाला अत्यंत आनंद देऊन जातात. तो आनंद आपल्याबरोबर share करावासा वाटला, आणि या गाण्याला भरभरून दाद द्यावीशी वाटली म्हणून हा लेख.
प्रस्तावनेनंतर आता आपण 'जीवलगा कधी रे येशील तू' या गाण्याच्या शास्त्रीय अंगाकडे पाहुया. या गाण्याचं हे एक शास्त्रीय संगीताच्या दृष्टीतून केलेले एक रसग्रहण आहे असं आपण म्हणुया.

धृवपद आणि ४ कडवी असं हे गाणं आहे. हे गाणं अत्यंत प्रवाही लयीत आहे. धृवपद आणि पहिलं कडवं अर्थातच आपल्या सर्वांच्या आवडत्या यमन रागात आहे. यमन हा बाबुजींचा अत्यंत आवडता राग. अतिशय प्रसन्न राग. का बरं बाबुजींनी यमन रागाचा उपयोग केला असावा? आपण जरा विचार करूया. आधी सांगीतल्याप्रमाणे चित्रपटाच्या नायिकेचा पती हा युध्दावर गेला असतांना बेपत्ता झालेला असतो. पण तो मरण पावलेला नसून एक दिवस नक्की परत येईल असा विश्वास या नायिकेला असतो. आणि हा विश्वास इतका दृढ असतो की कुठलाही अमंगल विचार तिच्या मनांतदेखील येत नाही. उलट तिची तर ही लाडीक तक्रार आहे की 'दिवसा मागून दिवस चालले ऋतू मागुनी ऋतू मागुनी ऋतू, जीवलगा कधी रे येशील तू?' ती प्रियकराची वाट पहात आहे, तरी तिचं मन प्रसन्न आहे! (अभिनेत्री सीमा यांनी हे काम फार छान केलं आहे.) म्हणूनच यमन निवडला असेल का बाबुजींनी? 'जीवलगा' किंवा 'कधी रे' या शब्दांचं उच्चारण बघा किती प्रेमळ आणि रसीलं आहे! क्या बात है!

'धरेस भिजवूनी गेल्या धारा' मधल्या यमनचा प्रवाहीपणा बघा काय सुरेख आहे. खास करून 'भिजवुनी गेल्या धारा' मध्ये यमनची अनुक्रमे तीव्र मध्यम, शुध्द गंधार, आणि शुध्द निषाद अशी छान उतरती कमान आहे. हे तीनही शब्द बोलतानेच्या स्वरुपात आहेत. 'फुलून जाईचा सुके फुलोरा' हा अगदी स्वाभाविक यमन म्हणावा लागेल. सुके फुलोरा हे शब्द पुन्हा प्रवाही बोलतानेमध्ये बांधले आहेत! पहिल्या ओळीतील 'धारा' या शब्दात तीव्र मध्यमातून जो प्रश्न विचारला आहे, त्याचं सुंदर उत्तर दुसऱ्या ओळीतल्या 'फुलोरा' तल्या षड्जाने दिलं आहे! 'नभ धरणीशी जोडून गेले सप्तरंग सेतू' या ओळीतला "गेले' या शब्दातला प्रवाहीपणा पहा. 'सप्तरंग' हा शब्द काय सुरेख बांधला आहे पहा. अगदी र वरचा अनुस्वार देखील आपल्याला ऐकू येतो!! आणि अर्थातच सेतू तल्या तू वरची खास यमनातली उकाराची तान आपल्याला अगदी स्वाभाविकपणे 'कधी रे येशील तू' या मुखड्यावर आणून सोडते! क्या बात है!

'कधी रे येशील तू' हे शब्द गाण्याकरता आशाताईच हव्यात! आपण नेहमी ऐकतो की बाबुजी शब्दांना आणि त्यातल्या भावांना फार महत्व देतात, त्याच्या प्रत्यय 'जीवलगा, कधी रे येशील तू' ही ओळ ऐकतांना येतो. ही जरी एकच ओळ असली तरी ती ओळ बाबुजींनी 'जीवलगा' आणि 'कधी रे येशील तू' या दोन Phrases मध्ये किती चपखलपणे बांधली आहे पहा!!

झालं. आता ऋत्तू बदलला. अजून जीवलग येत नाहीये! शरद ऋतु सुरू झाला, आणि संपला देखील!
'शारद शोभा आली गेली,
रजनीगंधा फुलली सुकली'!
मंडळी, हे कडवं बाबुजींनी 'केदार' रागात बांधलं आहे. राग केदार! मंडळी, केदार म्हणजे स्वरांचा उत्सव! एक रसिला, रंगीला राग! केदारची महती मी काय वर्णावी? आपल्याला पटकन संदर्भ लागावा म्हणून इथे एक उदाहरण देत आहे. गुड्डी चित्रपटातलं 'हमको मन की शक्ती देना' हे गाणं आठवून पहा. हे सुंदर गाणं केदार रागात बांधलेलं आहे. "शारद शोभा आली गेली, रजनीगंधा फुलली सुकली'! वा वा! काय सुंदर केदार मांडला आहे इथे! 'शारद शोभा' तला शुध्द मध्यम पहा! मंडळी, शुध्द मध्यम हा स्वर म्हणजे केदारातला एक अधिकरी स्वर! संपूर्ण केदार रागात या शुध्द मध्यमाची सत्ता असते. 'आली गेली' तल्या 'गेली' तल्या ली वरचा लाडीक धैवत पहा काय गोड आणि नटखट आहे! 'रजनीगंधा फुलली सुकली' तल्या फुलली तल्या ली वरून सुकली तल्या सु वरचं मोहक मिंडकाम पहा! 'चंद्रकलेसम वाढून विरले' हा पुन्हा स्वाभाविक केदार! 'चंद्रकलेसम' च्या सुरावटीतलं केदारचं शृंगारीक अंग! क्या बात है! आणि 'वाढुन विरले' तल्या विरले मधल्या शुध्द मध्यमाचा सवाल, आणि त्याला 'अंतरीचे हेतू' चा जवाब तर केवळ लाजवाब! आणि मंडळी आता करायचं काय? गाणं तर यमन रागात सुरू झालं होतं, आणि आपण आहोत केदारमध्ये! हे कडवं पुरं होऊन पुन्हा यमनतल्या धृवपदात जायचं कसं?!! इथे बाबुजींना का मोठं म्हणायचं ते समजतं. 'अंतरीचे हेतू' तल्या तू वरची जी उकारची तान आहे ती आपल्याला अतिशय बेमालूमपणे यमन मध्ये घेऊन जाते!!! ही तान आणि तिच्या माध्यमातून केदारचा यमनात प्रवेश!! ओहोहो.. एखादी वीज चमकावी असं क्षणभर वाटतं! मला या गाण्यातली ही गोष्ट सर्वात जास्त आकर्षित करते! ही उकाराची तान जेव्हा केदार मधून यमन रागात जाते ना, तेव्हा कानांना विलक्षण सुख देऊन जाते. बरं ही तान नुसतीच यमन मध्ये घेऊन जात नाही तर लगेच तिला जोडून 'कधी रे येशील तू' मधला मुळचा यमन पुन्हा प्रस्थापित करते! मंडळी, ही गोष्ट ऐकायला किंवा वाचायला फार सोप्पी वाटते, परंतु हे एक फार मोठं सांगितीक कौशल्य आहे!!
हेमंती तर नुरली हिरवळ
शिशीर करी या शरीरा दुर्बळ

मंडळी आता ऋतू बदलला. शारदातली शोभा संपली. 'हेमंती तर नुरली हिरवळ' ही ओळ बाबुजींनी सोहनी रागात बांधलेली आहे. मंडळी, सोहनी हा एक स्वतंत्र प्रस्थ असलेला राग आहे. एक विलक्षण आस असलेला हा राग आहे. मारवा थाटातला असल्यामुळे एक अनामिक हुरहूर सतत या रागात जाणवते. आपण वसंतरावांनी गायलेलं अभिषेकीबुवांचं 'सुरत पिया किन छिन बिसराई' हे गाणं ऐकून पहा! (अर्थात हे संपूर्ण गाणं सोहनी, मालकंस, आणि केदार या रागात आहे.) यातल्या 'हर हर दम उनकी याद आयी' या ओळीतली जी हुरहूर आहे ना तीच तर नाही ना 'हेमंती तर नुरली हिरवळ' या ओळीत? पहा बरं आपणच तपासून! :) किंवा मोगल ए आजम मधलं बडे गुलामअलीखासाहेबांचं 'प्रेम जोगन बन' ऐकून पहा बरं! ओहोहो! दिलिपकुमार आणि मधुबालेचा प्रणय, आणि पार्श्वभूमीवर खासाहेबांच्या लोचदार गायकीतला हा सोहनी!! किंवा कुमारजींचं 'रंग ना डारो शामजी' हे ऐकून पहा. मी वर म्हटल्याप्रमाणे एक अनामिक हुरहूर सतत जाणवते या रागात. तसं म्हटलं तर शृंगाररसही आहे आणि त्याच्या पूर्ततेकरताची लागलेली एक हुरहूर. तीही आहे! असं अजब रसायन असलेला हा राग आहे! 'हेमंती तर नुरली हिरवळ' ही ओळ सोहनी मध्ये बांधतांना बाबुजींना हेच तर नसेल ना सांगायचे? 'शिशीर करी या शरीरा दुर्बळ'! मंडळी, हे अर्थातच 'हेमंती तर नुरली हिरवळ' या सोहनीला उत्तर आहे. हा सोहनी नाही. कारण या ओळीतलं 'या' हे अक्षर पंचमावर आहे आणि पंचम हा स्वर सोहनीत वर्ज्य आहे. मग या ओळीतली सुरावट काय सांगते? पुरियाधनाश्री? त्याचं नक्की स्वरूप स्पष्ट होत नाही. मग आता पुढे काय? सोहनी तर नाही. मग आता कोण? हेमंतातली नुरलेली हिरवळ, शिशीरातली कडाक्याची थंडी, सोहनीमुळे झालेलं एक आतूर, अस्वस्थ वातावरण! जीवलग तर येत नाहीये! मंडळी, याचं उत्तर आपल्याला पुढच्या ओळीत मिळतं!!

'पुन्हा वसंती डोलू लागे,
प्रेमांकित केतू'!!
काय, मिळालं का उत्तर? :)

अहो हा आपल्या सगळ्यांचा लाडका बसंत!
झाली की नाही मगासची शिशीरातली सगळी हुरहूर, आतुरता क्षणांत दूर?! अहो, बसंत रागच तसा आहे! बसंत म्हणजे उत्साह, एक नवी उमेद. बसंत राग म्हणजे वैभव! वसंत ऋतूत सगळा निसर्गच अक्षरशः गात असतो!! बाबुजींनी 'पुन्हा' या शब्दात शुध्द मध्यमाचा अत्यंत प्रभावी उपयोग करून, 'पुन्हा वसंती' या शब्दद्वयाद्वारे गाणं एका क्षणात बसंत रागात नेलं आहे! मंडळी, आशाताईंनी गायलेला 'डोलू लागे' हे शब्द आपण नीट ऐका. एवढा काळ लोटूनसुध्दा त्या नायिकेचाचा नवरा युध्दावरून नक्की परत येणारच अशी जी खात्री तिला आहे ना, ती खात्री, ती आशा या 'डोलू लागे' या दोन शब्दात स्पष्ट दिसते!! पुढच्या 'प्रेमांकित केतू' तल्या 'प्रेमांकित' या शब्दाने बसंत पूर्ण झाला आहे आणि 'केतू' तल्या 'तू' वरून गाडी पुन्हा 'जीवलगा कधी रे येशील तू' या ध्रुवपदातल्या यमनच्या मूळ साम्राज्यात!! 'पुन्हा वसंती डोलू लागे, प्रेमांकित केतू', 'जीवलगा कधी रे येशील तू' नीट ऐका मंडळी, गाडीने कुठे फाटा बदलला तो!! :)
पुनरपी ग्रीष्मी तीच काहिली,
मेघावली नभी पुनरपी आली,
पुनश्च वर्षा लागे अमृत,
विरहावर ओतू

वसंतपण संपला आणि ग्रीष्मातील काहिली सुरू झाली! ग्रीष्मही रखरखीतच गेला, पण जीवलग अजून काही आला नाही. आता ग्रीष्मही संपत आला, आणि हे दाखवण्याकरता बाबुजींनी'पुनरपी ग्रीष्मी तीच काहिली' ही ओळ मिया मल्हारात बांधली आहे! 'पुनरपी ग्रीष्मी' या थोड्याश्या अवखळ मल्हारच्या सवालाला बाबुजींनी 'तीच काहिली' च्या सुरावटीतून मल्हारातूनच तेवढंच वजनदार उत्तर दिलं आहे! खास करून काहिली या शब्दाचं वजन पहा! क्या बात है!! 'मेघावली नभी पुनरपी आली'!! मंडळी, ही ओळ नीट ऐका. बाबुजींनी छान चढत्या क्रमाने, आरोही अंगाच्या मल्हाराचे फार सुरेख रूप या ओळीत दाखवले आहे! 'मेघावली नभी' हे दोन शब्द छानपणे सप्तकाच्या पूर्वांगात आहेत, आणि 'पुनरपी आली' हे दोन शब्द उत्तरांगात! बोलबोलता अंधारून येतं आणि हळुहळू पाऊस सुरू होऊन काही वेळातच चांगलाच जोर धरतो असं वाटतं की नाही? मंडळी, हीच तर ताकद आहे मल्हारची! 'पुनश्च वर्षा लागे अमृत विरहावर ओतू'! आहाहा! गाणं गेलं की हो संपूर्णपणे मल्हारच्या ताब्यात!! :) 'पुनश्च वर्षा लागे' ची सुरावट ऐकतांना धो धो पाऊस सुरू आहे आणि त्यातच मधूनच एखादी कडाडून वीज चमकावी असं वाटतं की नाही? आणि 'लागे अमृत' हे शब्द थोड्याश्या विलंबानेच, अवकाशानेच उच्चारले आहेत, त्यामुळे संपूर्ण आसमंतात दूरदूरपर्यंत सुसाट पाऊस सुरू आहे, असा परिणाम त्यातून बाबुजींनी साधला आहे! क्या बात है!'विरहावर ओतू' तल्या 'वर' या शब्दातून आपण पुन्हा अत्यंत चपखलपणे मूळच्या यमनमध्ये जातो! येथे आपण असं म्हणू शकतो की 'पुनश्च वर्षा लागे अमृत' या मल्हाराच्या सवालाला 'विरहावर ओतू, जीवलगा कधी रे येशिल तू' हे यमनचं फार सुरेख उत्तर बाबुजींनी दिलं आहे!!!

असो! मंडळी काय आणि किती लिहू या गाण्यावर? माझ्या परिने मी या गाण्याच्या शास्त्रीय अंगाकडे बघायचा प्रयत्न केला आहे. जो आनंद हे गाणं ऐकतांना मला स्वतःला झाला तो मी आपल्याला सांगायचा हा एक प्रयत्न केला आहे. जे काही चुकलं असेल तर ते माझं, आणि जे काही चांगलं लिहीलं असेल ते माझ्या बाबुजींचं!!

वास्तवीक, हे एक तीन-चार मिनिटात संपणारं गाणं, पण काय काय सांगीतलं आहे त्यात बाबुजींनी इतक्या थोड्या अवधीत?! खरंच कमाल वाटते!! गदिमांच्या शब्दांची जादू केवळ अवर्णनीय! आणि आशाताई? जाऊ दे मंडळी. त्यांच्याबद्दल मी काय बोलू?!!

मंडळी, साधारण १०-११ वर्षांपुर्वी मी याच गाण्याच्या संदर्भात अशाच अर्थाचं एक विस्तृत पत्र बाबुजींना पाठवलं होतं. तेव्हा बाबुजींनी "अरे तू किती छान विचार केला आहेस या गाण्यावर! तुझी अशीच चांगली प्रगती होऊ दे", असा असा आशिर्वाद दिला होता! "तुझं पत्र वाचून खूप बरं वाटलं, आणि मी तुझं हे पत्र जपून ठेवणार आहे", असंही म्हणाले होते!!

असेल का हो अजूनही माझं पत्र बाबुजींच्या घरी?!!

--तात्या अभ्यंकर.

9 comments:

सर्किट said...

सुंदर लिहीलयेत तुम्ही हे पोस्ट.. तुमच्या बुवांची गोष्ट वाचून "ठेविले अनंते तैसेचि रहावे, चित्ती असू द्यावे समाधान" असे म्हणणारे तुकाराम महाराजच आठवले.. आहे त्यात समाधानी रहाणे, यातच जीवनाचे खरे सार्थक; पण तेवढा आत्मसंयम मिळवणेही कितीदा दुरापास्त होवून जाते!

Anonymous said...

I am 'Bhakta' of Shri Babuji. The song which you analysed is one of my most favourites song. Everytime when I listen, I get new happiness. But today you have given me greatest happiness. Great Tatya.

Shrikant Karode

धनंजय देव said...

आपले ब्लॉग रसिकांसाठी मेजवानीच आहे.
विशेषकरुन नविन पिढीसीठी तर अशी माहिती प्रथमच मिळत आहे.

हे गाणं आंतरजालावर उपलब्ध झाले आहे, त्याचा संकेत इथे देत आहे,

http://www.youtube.com/watch?v=QjZ_9XD1njY&NR

रसिकांना आधिक चांगले रसग्रहण करता येईल.

Tatyaa.. said...

Dear Shrikant, & Dhananjay

Thx a lot for ur replies..

Tatyaa.

Sonal said...

छान लिहिलाय लेख. खुप आवडला.. :)

Tatyaa.. said...

सोनल,

अभिप्रायाबद्दल मनापासून धन्यवाद..

तात्या.

Anonymous said...

Dear Tatya,

I read your blog.

mala kalena tumachya blog madhil lekhavar kay pratikriaya dyavi.

Tumche lekh manasvi astat.
Mala ek prashna padla aahe, kay tumchyasarakhi manasvi manase ajun jagat aahet ?

karan me sudha chalishila alo pan ajunparyant tumachyapramane manus mhanun jagalycha mala smarat nahi.

kevel paisa kamavinyacha ek yantra yevadhich ek swatachi olakh janavate.

Please I think, I gave very serious comment. take it easy.

Regards,
Mahesh Kulkarni, Pune

Anonymous said...

श्री. तात्या,

आपले रसग्रहण खूप वाचनीय झाले आहे. एकदोन वेळा नुसते वाचल्यावर, बरोबरीला गाणे लावून परत वाचले. मग तर फारच मजा आली.

प्रत्येक कडव्याला राग बदलणे आणि तरीहि गाण्यातला गोडवा कायम ठेवणे ही निश्चितच अवघड गोष्ट. ते ही अर्थाला आणि शब्दांना किंचितही धक्का लागू न देता! सुधीर फडकेच ते करू जाणे.

गाणे परत परत ऐकताना. दोन कडव्यांच्या मधले वाद्यसंगीताचे तुकडे लक्षात आले. प्रत्येक वेळी स्वरमंडळासारखे वाद्य आहे. तुम्ही उल्लेख केलेल्या तानेप्रमाणेच दोन रागांना सांधण्याचे, पहिल्या रागाचा परिणाम कमी करून दुसर्‍या रागाची वातावरणनिर्मिती करण्याचे काम त्याने होते असे वाटले. एकूणच योग्य वाद्यांचा कल्पक आणि सौंदर्यपूर्ण वापर हा दुसर्‍या पूर्ण लेखाचा विषय व्हावा !

एखादी सुंदर गोष्ट सुंदर का वाटते ते कळले की सौंदर्य द्विगुणित होते.

ते नेमके केल्याबद्दल धन्यवाद!

- विनायक पर्वते

Tatyaa.. said...

प्रतिसाद देणा-या सवांचे मनापासून आभार...

तात्या.